खेतिया l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवच्या विद्यार्थी विकास विभाग व शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग 2021 चा उदघाटन सोहळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील हे राहतील.
या युवारंगासाठी 106 महाविद्यालयांनी नोंदणी केली असून विद्यार्थ्यांसह, सहायक व संघ व्यवस्थापक असे एकूण 1470 जणांचा सहभाग राहणार आहे यात 502 विद्यार्थी तर 586 विद्यार्थीनिंचा समावेश आहे. साथ संगत देणाऱ्यात 95 व्यावसायिक तर 75 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येकी 106 पुरुष व महिला संघ व्यवस्थापकांची नोंद झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या विशेष संकल्पनेवर आधारित युवक महोत्सवात पाच रंगमंचावर 28 कला प्रकारात विद्यार्थी आपली कला सादर करतील. मुख्य उदघाटन सोहळा स्वातंत्र्य सेनानी स्व. अण्णासाहेब पी.के.पाटील रंगमंच क्रमांक एक वर आज दि. 20 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे. उदघाटक कुलगुरू प्रा.डॉ.व्ही. एल. माहेश्वरी हे असून अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील हे राहतील. यावेळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी, मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्रीताई पाटील यांची उपस्थिती राहील. उपस्थितीतीचे आवाहान मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील, विद्यापीठाचे प्र.कुलसचिव प्रा.के. एफ. पवार, युवारंगचे कार्याध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील, विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ.सुनिल कुलकर्णी, युवारंगचे समन्वयक प्रा.डॉ. आय.जे.पाटील, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व संघ प्रमुख बुधवारी सकाळपासून विद्याश्रम परिसरात दाखल झाल्याने चैतन्याचे वातावरण दिसून येत होते. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचे गर्दी झाली तर युवक महोत्सवात सहभागी विद्यार्थी – विद्यार्थीनीसह मार्गदर्शकांची मुक्कामाची व्यवस्था मंडळाच्या विविध वसतिगृहात करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्रत्येक रंगमंचावर कुलर लावण्यात आले असून जागोजागी मंडप उभारण्यात आले आहेत. महाविद्यालय परिसरातील स्वागत कमानी तसेच विविध बॅनर लक्ष वेधक ठरले असून दोन ठिकाणी सेल्फी पॉईंट खास विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आले आहे. आयोजन समितीच्या वतीने बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांचे भोजन व निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली असून वैद्यकीय पथकासह
ॲबुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजना एककाचा उपक्रमाच्या माध्यमाने स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत महिला सशक्तीकरण, माझी वसुंधरा अभियान, बेटी बचाओ -बेटी पढाओ, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रदूषण, निसर्ग संरक्षण, रक्तदान, सोशल मीडिया, रस्ता सुरक्षा, वेगवेगळ्या विषयांवर पोस्टर्स, रांगोळ्या काढून तसेच परिसरात ठिकठिकाणी फलक लावून विद्यार्थ्यांमध्ये जागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे सुमारे दोन वर्षांच्या कालखंडानंतर महाविद्यालयीन तरुणाई युवारंग निमित्ताने एकत्रित आले असून त्यांच्यात अत्यंत उत्साहाचे वातावरण दिसत आहे.