नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चिमलखेडी तसेच मणिबेली ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत सीएसआर फंडातून अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही देयके अदा न झाल्याने मजूरांची मजूरी रखडली होती. यामुळे ग्रामस्थांसह मजूरांनी देयके अदा होण्यासाठी जि.प.समोर ठिय्या आंदोलन केले. याची दखल घेत काल रात्री उशिराने देयकांचे धनादेश वितरीत करण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी व मणिबेली ग्रामपंचायतीअंतर्गत जांगठी येथे सीएसआर फंडातून ग्रामस्थांच्या सहमतीने अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. सन २०२० ते २०२२ पर्यंत अंगणवाडीचे बांधकाम करणाऱ्या मजूरांना मजूरी अदा करण्यात आलेली नव्हती. दोन्ही अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर १५ डिसेंबर २०२१ रोजी कार्यालयात पाठपुरावा करण्यात आला होता. सदरच्या देयकांसाठी अनुदान उपलब्ध असूनही देयकेे अदा करण्यात आलेली नव्हती. यामुळे गेल्या महिन्यात झालेल्या होळीसारखा सण देखील आदिवासी बांधवांना साजरा करतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. इमारतींचे बांधकाम झाल्यानंतर देयके अदा न झाल्याने मजूरी रखडली होती. यामुळे काल दुपारी चिमलखेडी व जांगठी येथील ग्रामस्थांसह काम करणाऱ्या मजूरांनी जि.प. गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी व जि.प. अध्यक्षांना निवेदन देत काम पूर्ण झाल्याने देयके अदा करण्यात यावे या मागणीसाठी जि.प.समोर ठिय्या आंदोलन केले. सदर आंदोलनाची दखल घेत रात्री ८ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, जि.प.सदस्य सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.वित्त अधिकारी श्री.गायकवाड आदींच्या उपस्थितीत देयकांचा धनादेश वितरीत करण्यात आला. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.ठिय्या आंदोलनात जांगठी येथील तुकाराम वळवी, चांद्या वळवी, सोद्या वळवी, रायसिंग वळवी, किरसिंग वळवी, गमेरसिंग वळवी, गुलाबसिंग वळवी, संदिप वळवी यांच्यासह सुमारे ३० ते ३५ ग्रामस्थ सहभागी झाले होते. तर चिमलखेडी येथील शिवराम वसावे, दमण्या वसावे, जान्या वसावे, नूरजी वसावे, जयसिंग वसावे, रामसिंग वसावे, दिला वसावे आदी सहभागी होते.