नंदुरबार । प्रतिनिधी
महावितरण कंपनीचा गलथान कारभारामुळे नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील दोन शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. शेतशिवारात गेलेल्या महावितरणच्या तारांमध्ये घसरण होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने दोन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर जळून राख रांगोळी झाल्याने विखरण येथील हताश झाले. एक शेतकरी आग विझवित असतांना त्यांचा हात जळाला असून गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विखरण येथील शेतकरी रतिलाल बापू पाटील (वय 55) व सुनिल जगन्नाथ पाटील (वय 60) या दोन शेतकऱ्यांनी बिकट परिस्थितीत सव्हे क्र. 14 /7 मध्ये उसाची लागवड केली होती. मात्र ऐन तोडणीवर आलेला ऊस शॉर्टसर्किटमुळे आग लागुन नुकसान झाले आहे. लागलेल्या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचा मिळून ३ ते ४ एकर ऊस जळून राख झाला आहे. आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केल्याने आग विझविण्यासाठी गेलेले शेतकरी रतिलाल पाटील यांचा हात देखील या आगीत जळाला असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. आग लागल्याची घटना माहिती होताच विखरणसह परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली आहे. यावेळी मिळेल त्या साधनांनी शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली आहे. यामुळे परिसरातील 30 एकर क्षेत्रात असलेला ऊस आगीपासून वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे. मात्र ही घटना रात्रीची झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती असे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. विखरण परिसरात ही दुसरी घटना असून या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. वीज वितरणच्या तारांमुळे झालेल्या आगीची माहिती संबंधित खोंडामळी येथील विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता श्रीमती साळुंखे यांना देण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच साळुंके यांनी घटनास्थळी येवून भेट दिली आहे. याबाबत मात्र पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. संबंधित विद्युत वितरण कंपनीने दोन्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे , अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा परिसरातील शेतकरी व सुनील पाटील आणि रतिलाल पाटील यांनी दिला आहे.