नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासन व महावितरणने कृषी वीज धोरणात दिलेल्या घसघशीत सवलतीचा लाभ घेत तळोदा तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्याने २० कृषिपंपांचे १५ लाख रुपये वीजबिल कोरे केले आहे.
हाजी निसारअली शेरमोहम्मद मक्रानी हे महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी आहेत. तळोद्यासह तालुक्यातील दलेलपूर व प्रतापपूर येथे ते स्वतःच्या शेतीसह इतर काही लोकांची भाड़ेतत्वावर शेती करतात. या शेतीच्या सिंचनासाठी सर्व ठिकाणी एकूण २७ कृषिपंप वापरत आहेत. ते नेहमी महावितरणला सहकार्य करतात, मात्र काही कारणाने या पंपांचे वीजबिल थकित होते.
शासनाने कृषी वीज धोरण आणल्यावर त्यांच्या सर्व संबंधित लोकांची महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी ३ ते ४ वेळा बैठक घेतली. त्यात हाजी निसारअली यांनी योजना समजून घेतली. शनिवारी (१२ मार्च) तळोदा येथे लोकअदालत असल्याने महावितरणने न्यायालय परिसरातच कृषी वीजबिल मेळावा आयोजित केला होता. त्यात ग्राहकांना कृषी धोरणाचे फायदे समजावून सांगण्यात आले. यावेळी वेळी निसार अली मक्राणी हेदेखील उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या सर्व शंका विचारल्या, सविस्तर चर्चा केली आणि त्यांना सर्व माहिती दिली. त्यांनी मी आज दुपारी बिल भरतो, असे आश्वासन दिले व दुपारी कार्यलयात येऊन एकूण २० वीजबिलांची थकबाक़ी १५ लाख २३ हजार ७० रुपये रोख व धनादेशाद्वारे भरली आणि ते थकबाकीमुक्त झाले.
महावितरणच्या वतीने उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील यांनी निसारअली यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सहायक अभियंता चेतन पाचपांडे, कनिष्ठ अभियंता विलास गुरव उपस्थित होते. उर्वरित पंपांच्या बिलांची ७ लाखांची थकबाकी २५ तारखेपर्यंत भरण्याचे तसेच इतर ठिकाणीही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्याचे आश्वासन निसारअली यांनी दिले. या वसुलीसाठी अभियंत्यांसह तंत्रज्ञ बी एन. राजपूत, ए.एच. कलाल, आनंदसिंग गिरासे यांनी प्रयत्न केले.