शहादा l प्रतिनिधी
सोमवारी संध्याकाळी शहादा तालुक्यातील
जयनगरसह परिसरात वादळी वारा, गारपीटसह पाऊस झाला होता. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी खा.डॉ.हीना गावित यांनी जयनगर आणि कोंढावळ येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच बळीराजाचे दुःख जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.
बेमोसमी पावसामुळे जयनगरसह परिसरातील कोंढावळ, निंभोरे, बोराळे, मातकुट, वडाळी, खैरवे, भाडगाव, बामखेडा, काकरदा, तोरखेडा गावांमध्ये रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काल महसूल विभाग व कृषी विभागातर्फे प्राथमिक पाहणी करण्यात आली होती. आज प्रत्यक्ष खा. डॉ हिना गावित यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी लवकरच पाठपुरावा केला जाईल, असे खासदार गावित यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी खा. डॉ हिना गावित यांच्यासोबत तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी, तालुका गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे , तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे, नंदूरबार भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील, महात्मा फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी, कृषी सहाय्यक सुकन्या निकम, मंडळ अधिकारी विजय साळवे, तलाठी किशोर जाधव, ग्रामसेविका आरती पाटील, उपसरपंच सुनील माळी, व शेतकरी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लवकर पिक पाहणी लावावी-
मागील वर्षापासून शेतकऱ्यांनी स्वतः पिक पाहणी करायची आहे. त्यानुसार रब्बी हंगामातही महसूल विभागातर्फे वेळोवेळी सूचना देऊनही अनेक शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नाहीये. म्हणून ज्या शेतकऱ्यांचे बेमोसमी पावसात नुकसान झाले आहे. त्यांनी लवकरात – लवकर पीक पाहणी लावावी, जेणेकरून पंचनामा झालेल्या शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतील.