नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील वरुळ शिवारातील शिवारात
मुलीकडे नेहमी वाईट नजरेने पाहत होता .त्याबाबत त्याला समज देऊन ही रात्रीच्या सुमारास घराजवळ आलेल्या एकास मुलीच्या वडिलांनी काठी व हाताबुक्क्यानी मारहाण करून खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी मुलीसह तिच्या आई वडीलांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत धमडाई फाट्यावर दि. 2 मार्च 2022 रोजी दुपारी 12 च्या सुमारास नंदुरबार निझर रोडच्या लगत पपईच्या शेताजवळ 35 वर्ष वय असलेल्या एका इसमाचे प्रेत मिळुन आले . त्याचे डोक्यावर पायावर तसेच पाठीमागील बाजुस मार लागल्याच्या खुणा होत्या . सदरचे प्रेत हे मनोहर व्यंकट पाटील यांचे खडी क्रशरवर काम करणारा जामसिंग सुरसिंग ठाकरे वय 35 वर्ष याचे असल्याचे निष्पन्न झाले . प्राथमिक माहीती घेता तसेच प्रेत हे रस्त्याचे बाजुस मिळुन आल्याने उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आला . घटनेची माहीती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदुरबार पी . आर . पाटील यांनी तसेच अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी घटनास्थळास भेट दिली . पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी गुन्हे शाखा , पुणे येथील प्रमुख म्हणून काम केले असल्यामुळे त्यांनी सर्व बाबींची बारकाईने पाहणी केली असता तो अपघात नसुन दुसराच प्रकार असल्याबाबतचे निरीक्षण नोंदविले . त्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , स्थानिक गुन्हे शाखा यांना त्याबाबत आवश्यक त्या सुचना देऊन घातपाताचा प्रकार आहे का ? याबाबत माहिती घेऊन खरा प्रकार उघडकीस आणण्याबाबत सांगितले . पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनास्थळास पुन्हा भेट देऊन मयताचे प्रेताचे तसेच घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले . मयत इसम हा खडी क्रशर येथे काम करीत असल्याने खडी क्रशरचे मालक मनोहर व्यंकट पाटील , तसेच खडी क्रशर येथे मयतासोबत काम करणाऱ्या इतर मजुरांकडे सखोल विचारपुस केली . सदर मयत व्यक्ती यास दारुचे व्यसन असल्याने तो दि. 1 मार्च 2022 रोजी रात्री दारु घेण्यासाठी गेला होता व त्याचा रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या एखाद्या वाहनाने अपघात केला असावा असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला . पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी त्यांचे पथकासह काम करण्यास सुरुवात केली . शवविच्छेदनाचे वेळी वैद्यकीय अधिकारी यांनीदेखील मयत हा अपघात मरण पावला असावा असा अंदाज व्यक्त केला . पोनि कळमकर यांनी आपल्या पथकासह खडी क्रशरचे सर्व मजुरांना विश्वासात घेऊन विचारपुस केली . त्यावेळी मयत व इतर 2 ते 3 मजुरांनी आदल्या दिवशी एकत्र दारु पार्टी केली होती अशी माहिती समोर आली . या माहीतीनुसार दारू पिण्यावरून काही वाद झाला असावा असे गृहीत धरुन सर्व मजुरांकडे पुन्हा सखोल विचारपुस करण्यास सुरुवात केली . मजुर सांगत असलेल्या हकीकतीमध्ये तफावत येत असल्याने त्यांचेवर अधिक संशय जात होता . परंतु कोणतीही उपयुक्त माहीती मिळत नव्हती . दरम्यानच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक हे घटनास्थळाचे आजुबाजुचे शेतांमध्ये चौकशी करीत होते . घटनास्थळास लागून असलेल्या मनोहर व्यकंट पाटील यांचे शेतातील गोठ्यावर राखणदार म्हणून काम करणारा खेमा जेगला वळवी हा पोलीसांना टाळत आहे असे निर्दशनास आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला . त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तो राहत असलेल्या गोठ्याचे परिसराची पहाणी केली . पाहणीदरम्यान गोठ्याच्या मागील बाजुस रक्ताचे काही डाग दिसून आले . त्यामुळे संशयीत इसम नामे खेमा वळवी याच्यावरील संशय अधिक बळावला . त्यामुळे त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली . खेमा वळवी हा राहत असलेला गोठा व मयत काम करीत असलेले खड़ी क्रशर हे जवळच असून फक्त रस्त्याचे व शेताचे अंतर आहे . मयत जामसिंग सुरसिंग ठाकरे हा गोठ्यावर येत असे व तो खेमाच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहतो असा अनुभव खेमा यास आला होता . त्या रात्रीदेखील मयत जामसिंग हा उशिरा दारु पिऊन खेमा काम करीत असलेल्या गोठ्याकडे आला होता . त्यावेळी खेमा जागाच असल्याने त्याने त्यास पाहिले व तो आपल्या मुलीबाबतीत काहीतरी वाईट कृत्य करेल असा त्यास संशय आल्याने त्याने त्याचे पत्नी व मुलीसह जामसिंगला लाकडी दांडक्याने डोक्यावर तीन चार वेळा मारले . त्यात तो खाली पडला त्यानंतर त्यास लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली . काहीवेळाने त्याने जामसिंग यास पाहिले असता तो मयत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले . जामसिंग हा मयत झाल्यामुळे खेमाची पत्नी व मुलगी घाबरली . तसेच पोलीस त्यांना पकडून नेतील अशी भिती त्यांनी व्यक्त केली . त्यावेळेस खेमाच्या डोक्यात एक कल्पना आली . मयत जामसिंग याचे मृत्युचे कारण कोणालाही कळू नये , तसेच त्याचा मृत्यु एक अपघात वाटावा असे त्यांनी ठरविले . खेमाने त्याचे पत्नी व मुलीसह मयत जामसिंग याचे पायास दोराने बांधून त्यास त्याचे घरापासुन जवळच असलेल्या नंदुरबार निझर रोडच्या लगत पपईच्या शेताचे बांधावर तो अपघातात मेला आहे असे भासवून टाकुन दिले . परंतु नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी नोंदविलेल्या निरीक्षणातून व तपासातून खरा प्रकार समोर आणला . अशा पध्दतीने अपघाताचा बनाव केला असतांना देखील खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे नेतृत्वाखाली यश प्राप्त झाले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार महेंद्र नगराळे , पोलीस नाईक दादाभाऊ मासुळ , विशाल नागरे , पोलीस अंमलदार अभय राजपुत , अभिमन्यु गावीत , शोएब शेख , चापीना रमेश साळुंखे यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे .










