नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील बामडोद शिवारात कडुलिंबाचे झाडातून 48 तासापासून पांढरा शुभ्र रस बाहेर पडत असल्याबाबत निसर्गाचा अनोखा चमत्कार म्हणून सोशल मीडियावर मॅसेज दिवसभर फिरत होता. याबाबत असलेल्या कारणांचा खुलासा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ पद्माकर कुंदे यांनी केला.
नंदूरबार तालुक्यातील खोंडामळी येथील शेतकरी दगा दौलत पाटील व संजय बन्सी पाटील यांच्या बामडोद गाव शिवारात शेत असून शेताच्या बांधावर कडुलिंबाचे झाड आहे. त्या झाडातून गेल्या 48 तासापासून पांढरा शुभ्र रस बाहेर पडत होता. त्याला उग्र वास येत आहे.याबाबत निसर्गाचा अनोखा चमत्कार अशा आशयाचा मॅसेज आज दिवसभर सोशल मीडियावर फिरत होता.याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ पद्माकर कुंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत सांगितले की, कडुलिंबाचे झाड जुने झाल्यानंतर ते ऊतींमध्ये (पेशी) जास्तीचे पाणी साठवू लागते. तसेच जिवाणू संसर्गामुळे, (‘ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स’ )म्हणतात, झाडाच्या देठात गाठी तयार होतात. जेव्हा वातावरणातील आर्द्रता जास्त असते तेव्हा या ट्यूमरच्या ऊती कमकुवत होतात आणि त्या फुटतात परिणामी द्रव बाहेर पडतो. ट्यूमरमधून द्रव सतत चार ते सहा दिवस बाहेर पडतो असे त्यांनी सांगितले.