नंदुरबार l प्रतिनिधी
ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छतेसाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची कामे महत्वाची आहे .राज्याच्या तुलनेत नंदुरबार जिल्हयात जल जीवन मिशन व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कामांची गती संथ आहे . पाणी व स्वच्छतेच्या कामात सुधारणा करावी अन्यथा संबंधीतावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला.
नंदुरबार जिल्ह्यातील जल जीवन मिशन व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कामांच्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली . या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चे प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील , जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक डॉ वर्षा फडोळ , उपमुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील ,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर उपस्थित होते . स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०२१ – २०२२ या अर्थिक वर्षात 333 ग्रामपंचायत अंतर्गत सांडपाणी घनकचऱ्याचे कामांचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे . मात्र अद्यापही बहुतांश ग्रामपंचयातीचे गावकृती आराखडे व अंदाजपञके तयार करण्यात आलेले नाहीत. यामुळे कामांना प्रत्यक्षात सुरुवात झालेली नसल्यामुळे राज्यस्तरावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे . यामुळे कामांचा आढावा घेणेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांचे अंदाजपत्रक तयार करून ,त्यास तांत्रिक मान्यता उप अभियंत्यांकडून दिल्या गेलेल्या नाहीत किंवा त्याची तपासणी केलेली नाही यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी अंदाजपत्रक तयार करण्यात येणार्या अडचणी व सदरच्या अडचणी समन्वयाने कशा सोडवाव्यात याविषयी मार्गदर्शन केले. तसेच एका आठवड्यात सदर अडचणी सोडवून कामाची प्रगती दिसली पाहिजे अन्यथा नाईलाजाने कारवाई करावी लागेल असा इशाराही दिला. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांचा दर्जा चांगला राहील याकडे तांत्रिक कर्मचारी यांनी लक्ष पुरवावे व ही कामे प्रस्तावित करताना त्यात शाश्वतता राहावी यासाठी विशेष लक्ष पुरविण्या बाबत सूचना केल्या .
बैठकीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेली सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय ची कामे तात्काळ पूर्ण करावीत तसेच कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी कामांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी देण्याच्या सूचना ही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या.
बैठकीस सर्व गट विकास अधिकारी , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सर्व उप अभियंता , शाखा अभियंता , विस्तार अधिकारी , जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.