नंदुरबार l प्रतिनिधी-
रक्त केंद्र, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे प्रथमच अत्यंत दुर्मिळ असलेल्या ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान करण्यात आले असून संबंधित रुग्णासाठी आवश्यक रक्तघटक उपलब्ध करून देण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. ही कामगिरी जिल्हा रुग्णालयासाठी अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद मानली जात आहे.
‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगटांपैकी एक असून वैद्यकीय भाषेत त्याला ‘एचएच रक्तगट’ असे संबोधले जाते. सामान्यतः A, B, AB आणि O या रक्तगटांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा ‘H Antigen’ हा घटक या रक्तगटात पूर्णतः अनुपस्थित असतो. त्यामुळे हा रक्तगट इतर रक्तगटांपेक्षा वेगळा ठरतो. भारतात साधारण दहा हजार व्यक्तींमागे एका व्यक्तीत हा रक्तगट आढळतो. विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात तो तुलनेने अधिक प्रमाणात आढळून येतो.
या रक्तगटाच्या व्यक्तींना केवळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चेच रक्त देता येते. चुकीने ‘O’ रक्तगट समजून रक्त दिल्यास गंभीर प्रतिक्रिया होऊ शकते. त्यामुळे अचूक तपासणी व योग्य निदान करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.
सदर रुग्ण हे पोस्ट गंगापूर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथील असून या दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करणे ही मोठी आव्हानात्मक प्रक्रिया होती. मालेगाव येथील रक्तदाता साजिद अन्सारी तसेच रक्तदाता समूहातील अस्लम शेख अन्सारी व एजाज अहमद यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. रक्तदाता शोध मोहिमेत विक्रम यादव, चोपडा येथील दीपक दादा जैन व नंदुरबार येथील राकेश चौधरी यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
मालेगाव रक्त केंद्राचे संचालक कैलास सोनवणे व अधिकारी-कर्मचारी वृंद यांनी रक्त संकलनासाठी विशेष सहकार्य केले. तसेच वाहनचालक विनय वळवी, रक्तकेंद्र वैज्ञानिक अधिकारी जयेश सोनवणे व प्रीतम मेंथेवाड यांनी तत्परतेने त्याच रात्री उशिरापर्यंत ‘बॉम्बे ब्लड’ची बॅग नंदुरबार रक्त केंद्रात पोहोचवून सकाळी रुग्णाला रक्त देण्यासाठी आवश्यक ‘क्रॉस मॅच’ व इतर चाचण्या पूर्ण केल्या.
दरम्यान, रक्त केंद्र, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे सन २०२५ मध्ये सहा हजारांहून अधिक रक्तसंकलन करून नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रमा वाडीकर व रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी प्रीतम मेंथेवाड यांनी या निदान प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली.
या उल्लेखनीय कार्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.








