नंदुरबार l प्रतिनिधी

समाजात हिंमतीलाच किंमत आहे. महिलांनी हिंमतीने व्यवसायात आत्मनिर्भय होऊन पुढे आलं पाहिजे.युवतींनी देखील शिक्षण घेऊन प्रगती करावी. नगरसेवक,नगरसेविका झाल्यावरच शहराचा विकास होत नसून,आपल्यातील कार्यकर्तुत्वामुळेच विकास करता येऊ शकतो.नगरपरिषदेचा माध्यमातून महिलांसाठी शासकीय योजना प्रभावीपणे यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार नगर परिषदेचा वतीने महिला दिवस निमित्त रविवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराचा डोममध्ये मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आ.रघुवंशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे बहिणींच्या सन्मान झाला. नंदुरबार जिल्ह्यात आज भगिनींच्या हातात खऱ्या अर्थाने सत्ता असून, विविध विभागांमध्ये त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटत आहे.
व्यासपीठावर नगराध्यक्षरत्ना रघुवंशी,उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, महिला व बालकल्याण सभापती शितल वसावे,शिक्षण सभापती भावना गुरव,नगरसेविका मनकुवर गिरासे,सोनिया राजपूत,चेतना वळवी,ज्योती राजपूत,वैष्णवी राजपूत,रेखा चौधरी,वंदना साळुंखे, लेखाधिकारी वैशाली जगताप,पं. दीनदयाळ योजनेचा राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान व्यवस्थापक मानसी मराठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत महिलांच्या सत्कार नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानातील पालिकेचा ६ बचत गटांना ४७ लाख ७५ हजार तर वैयक्तिक ७ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी विविध बँकांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात आले. त्याचा धनादेश नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले.
मेळाव्यात विविध उपक्रम
पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्यात शहरातील कानाकोपऱ्यातून महिलांची उपस्थिती होती. यावेळी नवजात बालिकांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. विविध स्पर्धेमध्ये नंदनगरीचे नाव उज्वल करणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षिसांचे वितरण झाले त्याचप्रमाणे शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला बचत गटाचा सदस्यांच्या सन्मानाने महिला भाराऊन गेल्या होत्या.मेळाव्यात बेटी बचाव बेटी पढावची शपथ उपस्थित महिलांना देण्यात आली.अभियानाची प्रस्तावना ज्योती पाठक यांनी केली.








