नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलन बाबत जनजाती आयोगाचे अध्यक्षा सोबतची चर्चा निष्फळ झाल्याने उद्या 22 जुलै रोजी नावापुर येथे आंदोलकांतर्फे रास्ता रोको करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजतागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिल (TAC) ची बैठक घेणेत यावी याबाबत दि. २८.०६.२०२४ पासून आजपावेतो जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे मागण्या मान्य होईपावेतो बेमुदत धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून सुरु आहे. सदर आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी दिनांक ८.०७.२०२४ रोजी आदिवासींचे मयतच्या वेळी वाजविले जाणारे पारंपारिक तुरवाद्य वाजविण्यात आले. त्यानंतर दिनांक १३.०७.२०२४ रोजी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या दिवशी आंदोलनस्थळी घंटानाद आंदोलन केले गेले. शासन स्तरावर आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे नाईलाजस्तव न्यायहक्कासाठी दिनांक २२.०७.२०२४ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ सुरत-नागपूर महामार्ग नवापूर जि. नंदुरबार मागण्या मान्य होईपावेतो रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सुध्दा लेखी निवेदनाद्वारे दिलेला आहे.
सदर मागण्या सोडविण्यासाठी आपल्या स्तरावरुन तात्काळ चर्चा घडवून मागण्या मान्य करणेसाठी महाराष्ट्र शासनास पाठपुरावा करावा अशी विनंती आज अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतारसिंग आर्या यांना आंदोलका तर्फे करण्यात आली आहे .
याबाबतीचे निवेदन आज जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतार सिंग आर्या यांना देण्यात आले आहे.यावेळी जनजातीय आयोगाचे अध्यक्ष अत्तार सिंग आर्या यांनी आंदोलकांना सांगितले की तुम्ही आंदोलन करू नका मी शासनाला तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडतो .परंतु त्यांनी आंदोलकांना लेखी स्वरूपात दिले नाही म्हणून 22 रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे आंदोलका तर्फे सांगण्यात आले आहे.यावेळी के टी गावित, हिरामण पाडवी तसेच आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.