नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांवर झालेल्या आतंकवादी हल्यातील दोषींवर कारवाई व्हावी या मागणीकरिता येथील तहसील कार्यालयासमोर जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या त्यानंतर निवेदन देण्यात आले.
नंदुरबार येथील तहसील कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत आज दुपारी निदर्शने करून नायब तहसीलदार रीनेश गावित यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील मजकूर असा गेल्या काही दिवसापासून जम्मू काश्मीर येथे आतंकवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
आतंकवादी भारतीय सैन्य दलातील जवानांवर हल्ला करत असून यात वरिष्ठ अधिकारी व अनेक जवान आतापर्यंत शहीद झाले आहेत. सातत्याने आतंकवादी कारवाई करत असताना केंद्रशासन या विरोधात कुठलिही ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई करत नाही. असे प्रथम दर्शनी जाणवत आहे. आम्ही या अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा जाहीर निषेध करीत आहोत. व देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहे. जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी केंद्र शासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची गरज आहे.
केंद्र शासनाने जम्मू काश्मीर येथे अतिरेक्याद्वारे भारतीय जवानांवर होणारे हल्ले कायमस्वरूपी थांबण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी तसेच अतिरेक्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, जिल्हा युवा सेना प्रमुख अर्जुन मराठे, महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी, सुनील सोनार,उप महानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी, चारुमती बागुल, तालुका उपप्रमुख सुनिता पवार, भटू तारगे, भक्तवत्सल सोनार, रावसाहेब मोरे, भिका शेख, दिनेश चौधरी,बूथ प्रमुख अनिल पाटील, तालुका उपप्रमुख अमृत ठाकरे, सुनील पवार, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील, बूथ प्रमुख रावसाहेब पाटील, उपतालुकाप्रमुख रवींद्र पाटील, गटप्रमुख अजय वळवी यांच्या सह्या आहेत.