नंदूरबार l प्रतिनिधी
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही विभाग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा आर्थिक दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या लाभार्थ्यांनी संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, व आपली उन्नती करावी, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेचे अधिकारी व नाशिक विभागाचे पालक अधिकारी हरिष भामरे यांनी येथे केले.
‘अमृत’च्या विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊन स्वतंत्र अर्ज दाखल करावेत, असेही भामरे म्हणालेत.
नंदूरबार येथे शुक्रवारी (दि.१९) विविध सामाजिक मान्यवर व लाभार्थ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक, विविध प्रशासकीय अधिकार्यांशी चर्चा आदींचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भामरे यांनी लाभार्थ्यांना ‘अमृत’च्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भामरे म्हणालेत, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे,
आर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, स्वयंरोजगारासाठी या घटकाला प्रोत्साहन देणे व लघुउद्योग निर्मितीस चालना देणे, कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे, आदी ‘अमृत’च्या योजना आहेत. या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही हरिष भामरे यांनी याप्रसंगी केले.
खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्या लाभार्थ्यांना सरकारच्या इतर संस्था, महामंडळ अथवा योजनांचा लाभ मिळत नाही, अशा लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेत असताना अधिक माहितीसाठी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे, असेही भामरे यांनी सांगितले.
मार्गदर्शन सत्रानंतर उपस्थित लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भामरे यांनी शहर व जिल्ह्यातील विविध मान्यवरांसह लाभार्थ्यांच्या भेटीगाठी घेतल्या व त्यांना ‘अमृत’च्या योजनांच्या प्रसार-प्रचारासाठी सहाय्य करण्याचे आवाहन केले. त्याला सर्व मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
तसेच, नंदूरबारचे उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांना अमृतच्या लाभार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्रे मिळावी, याबाबतचे सविस्तर पत्रदेखील ‘अमृत’च्यावतीने देण्यात आले. याप्रसंगी अनिल शर्मा, दिनेश पाठक, प्रमोद जोशी, गणेश पाठक, विपुल कुलकर्णी, तुषार उदारे, अजित कुलकर्णी, सुयोग जोशी, अतुल अग्निहोत्री, दिनेश मुळे, चेतन जोगी, नीलेश कुलकर्णी इत्यादी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.