नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील शेतकर्यांच्या समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अंतर्गत प्रदेश किसान कॉंग्रेस विभागाची शेतकरी संवाद यात्रेची सुरुवात नंदुरबार जिल्हापासून प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थिती होणार असून यावेळी कॉंग्रेसचे आजी-माजी आमदार, खासदार, विविध सेलचे पदाधिकारी, जि.प.सदस्य, ग्रा.पं.सदस्य, नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कॉंग्रेस किसान विभागाचे प्रदेश सचिव देवाजी चौधरी यांनी केले आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. धान, कापूस, ऊस, सोयाबीन व इतर पिकांच्या पिकविम्याची रक्कम अजुनही शेतकर्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे. परंतू सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे तीळमात्र लक्ष द्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून राज्यातील शेतकर्यांच्या विविध समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अंतर्गत असलेला प्रदेश किसान कॉंग्रेस विभागाची दि.४ ते ११ डिसेंबर २०२३ या दरम्यान शेतकरी संवाद यात्रा होणार आहे.
ही दि.४ डिसेंबर २०२३ रोजी नंदूरबार जिल्ह्यातून सुरू होऊन दि.११ डिसेंबर २०२३ रोजी या यात्रेचे मोर्चात रूपांतर होऊन नागपूर येथे संपन्न होणार आहे. यावेळी कॉंग्रेस किसान विभागाचे प्रांताध्यक्ष पराग पाष्टे यांच्या नेतृत्त्वात संवाद पदयात्रा होणार असून यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ.ॲड.के.सी.पाडवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जिल्हाध्यक्ष व आ.शिरीषकुमार नाईक, सुभाष पाटील, दिलीप नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जास्तीत जास्त कॉंग्रेस कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








