नंदुरबार प्रतिनिधी
अकांक्षित असलेल्या नंदूरबार जिल्ह्याला कुपोषणाचा कलंक तसाच असून कुपोषण मुक्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असला तरी मनुष्यबळाच्या अभावामुळे आरोग्य विभाग सलाइनवर असल्याचे सांगत महिला रुग्णालयात 200 क्षमता असतांना 500 महिला रुग्ण दाखल होतात तर नवजात शिशूंसाठीच्या ऑक्सिजन पेटीत 20 ऐवजी तब्बल 84 बालके दाखल होतात.याशिवाय बालक,मातांना पुरविला जाणारा पोषण आहार नित्कृष्ट दर्जाचा असल्याने बालमृत्यू व माता मृत्यू कसा कमी होणार? असा सवाल विधान परिषद आ.आमश्या पाडवी यांनी उपस्थित करत आरोग्य मंत्र्यांवरच रोष व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू व कुपोषणात वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर आयोजिप पत्रकार परिषदेत आ.आमश्या पाडवी बोलत होते. यावेळी आ.पाडवी म्हणाले की, सन 20119 पासून आरोग्य मंत्र्यांना 56 उपकेंद्रांचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र, याची दखल घेण्यात आलेली नाही.
अधिवेशन संपल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी नंदुरबार जिल्ह्याची भेट घेऊन आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना जिल्हा दौरा करायला वेळ मिळत नाही.राज्यात सर्वाधिक बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषणाचा प्रश्न असतांना सरकार डोळे लावून बसले आहे का? असा सवाल उपस्थित केला. याशिवाय जोपर्यंत शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत डॉक्टर्स खासगी रुग्णालयामध्ये सेवा देणे बंद करत नाहीत तोपर्यंत आरोग्य यंत्रणा बळकट होणार नाही, असे आ.पाडवी यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागाची रिक्त पदे तात्काळ भरावी व शासन दरबारी मंजूरीसाठी प्रलंबित असलेला जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या बृहत आराखडा तात्काळ मंजूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आ.आमश्या पाडवी यांनी दिला आहे.
नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त घोषीत करण्यात आला असला तरी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे.अक्कलकुवा तालुक्यातून सर्वाधिक मद्य वाहतूक होत आहे. तसेच पोलिसांसमोरच हा प्रकार सुरु असल्याचा खळबळजनक आरोप आ.आमश्या पाडवी यांनी केला असून याबाबत तक्रार करुनही दखल घेण्यात न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.