नंदूरबार l प्रतिनिधी
ऊस तोड मजुरीसाठी माळशिरस तालुक्यातील तोंडले येथे गेलेल्या कालीबेल (ता. धडगांव) येथील ईश्वर सिपा वळवी यांचा मनमाड येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी तोंडले ता. माळशिरस जि. सोलापूर येथे दोघे व कालीबेल येथील मुकादमाची सखोल चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयताचा भाऊ सागर सिपा वळवी यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह मिठात पुरुन ठेवला असून पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सागर वळवी यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तोंडले गावातील दोघा इसमांनी ऊसतोड कामासाठी कालीबेल (ता.धडगाव) येथून 28 नोव्हेंबरला ईश्वर सिपा वळवी व गावातील काही मजुरांना मुकादमामार्फत घेवून गेले होते. परंतु तोंडले या गावात 20 ते 25 लोकांच्याऐवजी पाच, सहाच मजूर होते.

त्यामुळे पाच सहा जणांना ऊस कापणे, ऊसाची मोळी बांधणे, ट्रॅक्टर भरणे शक्य नसल्याने ईश्वर वळवी यांनी अजून काही मजुरांना घेऊन या तेव्हाच काम पूर्ण होतील असे मुकादमांना सांगितले. परंतु मुकादम यांनी मागणी पूर्ण न करता तुम्हालाच पूर्ण काम करावे असे सांगून जबरदस्तीने ऊस तोड करायला लावायचे. ऊसतोड न केल्यामुळे तेथेच ईश्वर वळवी व इतर मजूरांना मारहाण करण्यात आली. शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने ईश्वर वळवी हा घरी येत असतांना मनमाड येथे दि.4 नोव्हेंबरला त्यांना तिघांनी एस.टी.बस मधून जबरदस्तीने उतरवून घेतले.
त्यावेळी त्यांच्यापासून माझ्या जीवास धोका आहे मला लवकर घ्यायला यावे, असा फोन ईश्वर वळवी यांनी त्यांच्या वडिलांना केला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. दि.5 नोव्हेंबर रोजी सकाळी ईश्वर सिपा वळवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी फोन करून सांगितले.
त्यानुसार कुटुंबियांनी मनमाड गाठले व तेथून कालिबेल येथे मृतदेह आणला. प्रत्यक्ष मृतदेह बघितल्यावर त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा दिसून आल्या. ही आत्महत्या नसून मारहाण करून, गळा दाबून हत्या करण्यात आली आहे, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
मयत ईश्वर वळवी यांच्यावर अंत्यविधी न करता त्याचा मृतदेह मिठात पुरून ठेवण्यात आला आहे. जोपर्यंत आरोपीवर कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही. तसे न झाल्यास पुन्हा शव विच्छेदन करण्यात यावे अशी मागणी सागर वळवी यांनी केली आहे.








