चिनोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील परिसरातील भाविकांमध्ये अस्तंबा ॠषिच्या यात्रेचे वेध लागले असून त्यासाठी हजारो भाविक काल यात्रेसाठी मोठ्या उत्साहाने रवाना झाले.
सातपुड्यातील उंच डोंगर, दोन्ही बाजूला असलेल्या हजारो फूटाची खोल दरी, नागमोडी खडतर रस्ता आणि या उंच शिखरावर असलेले अस्तंबा ऋषीचे विश्राम स्थान असलेल्या अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ घेवून घोषणा करीत भाविक हजारो फूट शिखर सहज चढतात. दिपावली पर्वातील धनत्रयोदशीला अस्तंबा ऋषीची यात्रा भरत असते. या यात्रेला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील हजारो भाविक पदयात्रेने अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने शिखराकडे रवाना होतात.
निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना वेध असते. म्हणूनच या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या वर्षानुवर्ष वाढत आहे. समुद्र सपाटीपासून साधारणतः चार हजार फूट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे देवस्थान आहे. भाविकांची अपार श्रध्दा असल्याने हाती भगवा झेंडा घेत ‘अस्तंबा ऋषी महाराज की जय’ चा जयघोष करीत भाविक पदयात्रेने दर्शनासाठी श्रध्देने हजेरी लावतात.
दिवाळी पर्वातील धनत्रयोदशीला यात्रोत्सवाला प्रांरभ होत असतो. शापस्थ अवस्थेत जखमांनी विव्हळणारा अश्वस्थामा आपल्या जखमांसाठी सातपुड्याचा दऱ्या-खोऱ्यात तेल मागतो. आजही शिखरावर जाणाऱ्या यात्रेकरूंणा तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन करतो अशी अस्तंबा ऋषीचे दंतकथा असल्याचे सांगण्यात येते. अश्वस्थामा यांचा महाभारतात उल्लेख असला तरी त्यांचे स्थान भारतात कुठेही आढळत नाही. मात्र अश्वस्थामा (अस्तंबा) उल्लेख सातपुड्याच्या कुशीमध्ये उंच शिखरावर असल्याचे दिसून येते.
दिवाळीच्या पर्वाला अस्तंबा ऋषीच्या यात्रेला सुरूवात होते. तळोदा येथून एक दिवस अगोदरच कॉलेज रोडपासून वाजत-गाजत मिरवणूकीने मंदिराचे दर्शन घेवून यात्रेकरू अस्तंबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होत असतात. कोठार, देवनदी, असली, नकट्यादेव, जूना अस्तंबा, भिमकुंड्या या मार्गाने अस्तंबा ऋषी यात्रेला जातात. तसेच श्वापदांना दूर ठेवण्यासाठी ढोल-ताशे तर रात्रीच्या उजेळासाठी टायर, टेंभे अशा दिर्घकाळ जळणाऱ्या वस्तू या यात्रेत घेतल्या जातात. रात्रीचा प्रवास करुन अस्तंबा ऋषीच्या शिखरावर जाऊन धनत्रयोदशीला पहाटेच्या सुमारास भक्तीभावाने दर्शन घेवून ध्वज लावतात. सुमारे तीन दिवस ही यात्रा पूर्ण केली जाते.
एकवेळा, पाच वेळा, अकरा वेळा यात्रा करण्याचा नवस बोलला जातो. चिरंजीव अश्वस्थांमा पूजण्यामागे केवळ एक श्रध्दा आहे. त्यांच्यासारखे दिर्घायुष्य मिळावे यासाठीच कदाचित ही यात्रा असते असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानंतर सर्व यात्रेकरू तळोदा येथे एकत्रित येवून ढोल ताश्याचा गजरात भव्य मिरवणूक काढतात. त्यानंतर पदयात्रा पूर्ण करुन परतीच्या प्रवास करीत भाविक घरी परततात. त्यामुळे परिसरातील भाविकांना अस्तंबा ॠषिच्या यात्रेसाठी हजारो भाविक रवाना झाले आहेत.








