नंदुरबार l प्रतिनिधी
पोलिसांचे अर्धे आयुष्य त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप, तक्रारी,चौकश्यामध्येच जाते. पोलिसांच्या नशिबी फक्त शिव्या अन दगडच आहेत परंतु, चांगल्या कामाची पावती म्हणून सन्मानामुळे कार्यास बळ मिळते असा आशावाद जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील धानोरा गावातील व्यापाऱ्याच्या गोदामातून १०४ अजवानचे पोते चोरुन नेल्याची घटना घडली होती. त्या घटनेमुळे व्यापा-यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कुठल्याही प्रकारचे पुरावे नसतांना उपनगर पोलिस ठाणे व एलसीबीच्या पोलिसांनी पथकांनी आपल्या अनुभव कौशल्याचा जोरावर आरोपींना अटक करत मुद्देमाल जप्त केला म्हणून नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे,स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर,तालुका पोलीस निरीक्षक राहुल पवार, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्तावना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष परवेज खान यांनी केली.यावेळी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचार्यांच्या पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, पोलिसांवर त्यांच्या आयुष्यात कधीही स्तुतीसुमने उधळली जात नाहीत. नेहमी त्यांच्याविरोधात चौकशी,अर्ज फाटे व तक्रारीने नकारात्मकता वाट्याला येते. परंतु,अशा परिस्थितीत सत्कारात सन्मानाचे चार शब्द ऐकायला मिळाले तर कार्याला बळ मिळते.जिल्ह्यातील कारवायांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे. पोलिसांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी जि.प माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, सरपंच मनोज पाडवी, माजी जि.प सदस्य तानाजी वसावे,बालसिंग चौधरी,डॉ. अजय श्रीवास्तव,डॉ.सी.एस पाटील, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष छोटू चौधरी,सचिव रमेश पाटील, खजिनदार धनेश सेवलानी, सल्लागार चेतन चौधरी,रोशन वसावे,नितीन चौधरी,भूषण पाटील,जयेश चौधरी,सुनील पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.