नंदूरबार l प्रतिनिधी
सुजलॉन कंपनीने बळकावलेल्या नंदुरबार तालुक्यातील सर्व शेतकर्यांच्या जमिनी परत देवुन नुकसान भरपाई द्यावी तसेच सुजलॉन खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेनचे जिल्हाध्यक्ष एम.जी.राजपूत , जिल्हा उपाध्यक्ष योगेश नामदेव पाटील व जितेंद्र साहेबराव पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारींना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात सुजलॉन कंपनीचा पवन उर्जा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पासाठी नंदुरबार तालुक्यातील शेकडो शेतकर्यांच्या जमिनी सुजलॉनची उपकंपनी सर्जन रियालिटीज लि. या कंपनीने फसवणुकीद्वारे खरेदीखत/साठेखत व कुलमुख्यातरपत्र तयार करुन हजारो हेक्टर शेतजमिनी बळकावल्या आहेत. या जमिनीसाठी या कंपनीने गावा-गावात दलालांमार्फत भोळ्या व निरक्षर शेतकर्यांना वेगवेगळे आमिष दाखवून जमिनी नावावर करुन घेतल्या आहेत. जमिन व्यवहार करतांना शेतकर्यांना सदर जमिनी फक्त भाडे करारावर आहेत. जमिनीची मालकी व ताबा सर्व शेतकर्यांकडे राहणार असल्याचे भासवून शेतकर्यांची फसवणूक केली आहे. सुजलॉनने शेतकर्यांना दहा ते पंधरा हजार रुपये असा कवडीमोल मोबदला देऊन जमिनीवर ताबा बसवला आहे. या शेतजमिनी करोडोंचा मोबदला घेत मोठ-मोठे बिल्डर, सिने अभिनेता व इतरांना विकल्या आहेत. तब्बल १६ वर्षे सुजलॉन कंपनी दादागिरीने या जमिनी बळकावून बसली आहे. ज्या जमिनी शेतकर्यांनी विकल्या नाहीत त्यांचीही खरेदी दाखवण्यात आलेली आहे. संबंधित रजिस्ट्रार, दलाल तसेच सर्जन रियलिटीजचे तत्कालीन अधिकारी व पदाधिकारी यांनी फसवणूक करीत शेतकर्यांना लुबाडले आहे. गेल्या सोळा वर्षापासून सुजलॉन कंपनी शेतकर्यांच्या जमिनीचा उपभोग घेत आहे. कंपनीने शेतजमिनीवर रस्ते, टॉवर उभारुन सर्व शेतजमिनी खराब केल्या आहेत. यामुळे सर्व जमिनी निरुपयोगी झाल्या आहेत. या सर्व जमिनीची नुकसान भरपाई तालुक्यातील गोरगरीब शेतकर्यांना मिळाली पाहिजे. कारण या जमिनीवरच शेतकर्यांचा उदरनिर्वाह आहे. सुजलॉन कंपनीने दिशाभुल करुन फसवणुकीने ज्या शेतकर्यांच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. त्या सर्व शेतजमिनीची खरेदी व सातबारावरील इतर अधिकाराची नोंद रद्द करण्यात यावी. ज्या लोकांनी शेतकर्यांची फसवणूक केली आहे. जमिन खरेदीची चौकशी करुन संबंधित रजिस्ट्रार, तलाठी, सर्जन रियलिटीजचे अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन सुजलॉनने सर्व शेतकर्यांना सोळा वर्षापासूनची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच सर्व शेतजमिनी शेतकर्यांच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर कारवाई त्वरीत करावी अन्यथा याविरोधात आमच्या संघटनेतर्फे जनआंदोलन, रास्ता रोको व आमरण उपोषण सदर शेतकर्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.