महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं दशकपूर्ती अधिवेशन. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक सामाजिक चळवळीतील नेत्यांच्या, मान्यवरांच्या ,वक्त्यांच्या उपस्थितीने हे अधिवेशन अविस्मरणीय झाले. पहिल्यांदाच दशकपूर्ती च्या निमित्ताने हजारापेक्षा अधिक कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने हजर होते .पुण्यातील शिवशंकर सभागृह तीन दिवस विविध कार्यक्रमाने, भाषणांनी चर्चासत्रांनी व्यस्त होते. यात हजेरी होती बाबांची म्हणजे डॉ. अनिल अवचट यांची त्यांना एका सत्राच्या दरम्यान अचानक पणे स्टेजवर बसवण्यात आले. त्यावेळचे त्यांचे भाषण आजही स्मरणात आहे.ते म्हणाले,” नरेंद्रला मी हे कबूल केलं होतं की मी येणार, पण श्रोता म्हणून येणार. मला भाषण द्यायला नको सांगूस. पण आज मात्र नरेंद्रने त्याचा शब्द पाळला नाही “,असं म्हणत त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. सहजसोपे शब्द, किस्से, अनुभवांचे कथन, विद्वत्ताप्रचुर शब्दांपासून कितीतरी दूर साध्या-सोप्या अनुभवांची गुंफण करीत त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवलं. मृत्यू नंतरचे जग ,हिंदू मृत्यूनंतर स्वर्ग-नरकात जाणार, मुस्लिमांचा “कयामत का दिन” असेल ,त्याचा तिथं हिशोब होणार, ख्रिश्चन आणखी कोठे जाणार आणि जिवंत असताना जर त्यांनी धर्म बदललेला असेल तर त्यांची केस फाईल ही या धर्मियांकडून त्या दरम्यान कडे कशी ट्रान्सफर होत असेल ? अशा अनेक मिश्किल कल्पनांसह त्यांनी खुमासदार शैली मध्ये अंधश्रद्धां निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांचं एकाच वेळेस प्रबोधन पण केलं आणि खळखळून हसायला ही लावलं. विचारांना आपल्या हलक्याफुलक्या शब्दांनीच बळ देणारा, एक कृतिशील, उत्साहाचा खळखळणारा झरा आजचा अचानकपणे विसावला. त्यांचं कार्यरत, धार्मिक ही खास चळवळींच्या कार्यकर्त्यांनी वाचायलाच हवीत अशी पुस्तक. त्यांचं साहित्य त्यांचे अनुभव कथन,प्रवास वर्णन सगळं कसं हलकंफुलकं. माणसाच्या जीवनाला चित्रित करणारा, माणूस समजून घेणारा, माणूसकी समजून सांगणारा, एक साधा सुधा आणि तितकाच मोठा माणूस आज आपण गमावला.
डॉ.अनिल अवचट यांना भावपूर्ण आदरांजली.
-विनायक सावळे.
9403259226.










