नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात दि.२४ जानेवारी २०२२ पासुन इयत्ता ५ वी ते १२ वी चे वर्ग असलेल्या शाळा सुरु करण्यात येणार असुन इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग तुर्तास सुरु करण्यात येऊ नये.याबाबतचे परिपत्रक जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आज काढले आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, दि.२४ जानेवारी २०२२ पासुन शाळा सुरु करणे संदर्भात शासननिर्देश प्राप्त आहेत .त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आदेश दिले आहेत.दि २४ जानेवारी २०२२ सोमवार पासून नंदुरबार जिल्ह्यातील इयत्ता ५ वी ते १२ वी चे वर्ग असलेल्या शाळा सुरु करण्यात याव्यात . तसेच जे विद्यार्थी शाळांमध्ये येत नसतील अशा विद्यार्थ्यांना ऑन – लाईन / ऑफ लाईन अध्यापनाच्या संदर्भात उचित कार्यवाही करावी . शाळेची वेळ विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३अशी असेल तर शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित रहावे . ज्या मोठ्या गावांमध्ये व नगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी पालकांची संमती घेऊन शाळा सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी . शाळांमध्ये कोरोना बाधित शिक्षक अथवा विद्यार्थी आढळून आल्यास सदर शाळा ५ दिवस बंद ठेवावी . उपरोक्त संदर्भ क्रमांक च्या शासन परिपत्रकास संलग्न केलेले परिशिष्ट अ व परिशिष्ट – ब बाबत काटेकोर पणे अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात यावी . तसेच इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग तुर्तास सुरु करण्यात येऊ नये . याबाबत यथावकाश निर्देश देण्यात येतील . मात्र या वर्गाना अध्यापन करणार्या शिक्षकांनी शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहुन ऑनलाईन / ऑफलाईन अध्यापनाची उचित कार्यवाही करावी . शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेने नियोजन करुन शालेय कामकाज कोव्हीड -१९ च्या निर्देशाप्रमाणे सुरळीत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आज दिले.