म्हसावद l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत आज उत्तर महाराष्ट्रातील महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रदेश कार्यालयात संपन्न झाली. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, माजी आमदार विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. आशा मिरगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी सुरेखा ठाकरे, संजय खोडके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकर ,नंदुरबार यांच्या हस्ते,सौ.अलका जोंधळे, संगिता पाडवी,हंसा अहिरे, प्रतिभा कुलकर्णी,यांना निरिक्षक म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्ष संघटना वाढवणे,पक्षाचे कार्यक्रम तळागाळात रुजवणे तसेच नागरी सुविधेची कामे सुरळीतपणे होण्याकरता, कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष यांच्यातील संवादाचा दुवा बनण्याचे काम हे निरीक्षक करतील,अशी भावना रुपाली चाकणकर यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे,महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी जोशी,संघटक शांतीलाल साळी,अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष दानिश पठाण,शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे,शहादा तालुका महिलाध्यक्ष रेशमा पवार यांची उपस्थिती होती.
या आढावा बैठकीला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील साहेब म्हणाले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर आजपासूनच जोमाने काम करावे लागेल. संघटनेच्या कामावर लक्ष ठेवणे,त्याचे निरीक्षण करणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी निरीक्षकांवर आहे.तसेच रेशनिंग दुकानाच्या समस्या सोडवणे, पोलिस स्थानकांमधील बैठका,बुथ बैठकांचा सविस्तर आढावा,भजनी मंडळ आढावा,शिक्षक आणि डॉक्टरांच्या गटांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेणे,असे विविध कार्यक्रम हाती घेऊन निरीक्षकांनी संघटना वाढवण्यास हातभार लावावा.”
पक्ष संघटना मजबूत व्हावी याकरता पुरूषांपेक्षाही स्त्रिया अधिक जोमाने काम करतात.तसेच पुरूषांपेक्षा स्त्रियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी प्रतिक्रिया नाशिकचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. पुढे ते म्हणाले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के जागा या महिलांना लढायच्या आहेत. महिलांची साथ जर मिळाली नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला टिकाव लागणार नाही.त्यामुळे गटातटाच्या राजकारणाला न जुमानता आपली शक्ती विभक्त होणार नाही याची काळजी घ्यावी. समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्त्रियांना संघटनेशी जोडून आपली शक्ती वाढवावी.”
सर्व उपस्थित महिलांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्याक्ष रूपालीताई चाकणकर यांनीदेखील मार्गदर्शन केले. तालुका निरीक्षकांच्या कार्यपद्धतीचे यावेळी विश्लेषण करण्यात आले.तळागाळात काम करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्ये यांच्या समस्या जाणून घेणे,नागरी सुविधेचे प्रश्न मार्गी लावणे, तालुक्याचा कार्यअहवाल जिल्हाध्यक्षांना सादर करणे, स्थानिक पोलिस स्थानकांमध्ये बैठका घेणे, भजनी मंडळाच्या बैठका घेणे, शिक्षक व डॉक्टरांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्याशी वारंवार चर्चा करणे अशा प्रकारे तालुका निरीक्षक कार्यरत राहतील असे त्यांनी सांगितले. पक्षसंघटना बळकट मजबूत करण्यासाठी गटबाजीच्या राजकारणापासून विभक्त राहून फक्त स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी नवनियुक्त महिला निरीक्षकांना केले.










