नंदुरबार | प्रतिनिधी
धुळे जिल्हयातील ८ व नंदुरबार जिल्हयातील १४ अशा २२ राज्यस्तर सहकारी उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरूस्ती कामांच्या ११५ कोटी रूपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा आज शासनआदेश निघाला. स्वतः जलसंपदामंत्री
जयंतराव पाटील यांनी हा आदेश राष्ट्रवादीचे नेते संदीप बेडसे यांच्या हाती सोपवित आणि लाडू भरवित तुझ्या पाठपुराव्याला यश आल्याची शाबासकी दिली.
राष्ट्रवादीचे धुळे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष संदीप बेडसे यांनी या उपसा सिंचन योजनांच्या ११५ कोटींच्या सुधारीत प्रस्तावास मान्यता मिळावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यापुर्वीच नियोजन व वित्त विभागाकडून त्यास हिरवा कंदील मिळाला होता. आज याबाबतचा शासन आदेश जारी झाला. यावेळी स्वतःजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या आदेशाची प्रत श्री. बेडसे यांच्याकडे सोपविली. शिवाय लाडु भरवून आनंदही व्यक्त केला. यावेळी
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदीक, शिवाजीराव गर्जे,युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण ,संजय खोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सन २००७-२००८ मध्ये तापी नदीवरील प्रकाशा (६२.११ दलघमी) व सांरगखेडा
(९१.८१ दलघमी) या बॅरेजेसच्या माध्यमातून १५३ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यातून साधारण १८ दलघमी पाण्याचा वापर होत असून उर्वरित १३५ दलघमी पाणी विना वापर राहिल्याने वाया जाते. भौगोलिक परिस्थितीमुळे उपसा
सिंचन योजने शिवाय पाणी शेतीपर्यंत पोहचणे शक्य नव्हते. सन २०१९ ला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सदरील २२
उपसा सिंचन योजना शासनामार्फत दुरूस्त करून पुनर्कार्यान्वित करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे संदीप बेडसे यांनी पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू केला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. २२ उपसा सिंचन योजनेत नंदुरबार जिल्हयातील १४ व धुळे जिल्हयातील शिंदखेडा तालुक्यातील ८ योजनांचा समावेश आहे.नंदुरबार जिल्हयातील १४ उपसा सिंचन
योजनांमुळे एकूण ९ हजार १९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील ८ उपसा सिंचन योजनेच्या कामामुळे साधारण २२ गावांमधील ३ हजार १५७ शेतकर्यांचे ५ हजार २२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाणी जवळ असून सुध्दा पाण्यापासून वंचित असलेल्या बळीराजाचे जिवनमान उंचावल्यास नक्कीच मदत होणार असल्याचेही श्री. बेडसे यांनी म्हटले आहे.
यावेळी श्री. बेडसे यांच्यासोबत माजी आ. रामकृष्ण पाटील, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे,रणजित राजे भोसले,ज्योती पावरा,सत्यजीत सिसोदे,मयुर बोरसे यांचीही उपस्थिती होती.