नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडयातील धडगांव तालुक्यातील तिनसमाळ हे तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले आहे. येथील नागरीकांना पाण्यासाठी एक किलोमीटर खोल दरीत उतरून पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. तर एकीकडे जि.प.च्या झालेल्या स्थायी सभेत मात्र संबंधित विभागाचे अधिकारी तिनसमाळ येथे पाणी पोहचल्याचा दावा करत आहे. मात्र प्रत्यक्षात गेले अनेक वर्षापासून त्यांचा पिण्याचा पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे.


तिनसमाळ (ता.धडगांव) हे सातपुडयातील जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. ६५० लोकसंख्या असलेल्या या गावात पाटीलपाडा, पळासपाणीपाडा, गुडाणचापाडा व डुठलपाडा असे चार पाडे येतात. याठिकाणी स्वातंत्र्यानंतर अद्यापही मुलभूत सुविधांपासून नागरीक कोसोदूर आहे. यामुळे सन १९९७ पासून आजपर्यंत गावकर्यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. त्यांना आजही एक किलोमीटर दरीत उतरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. सन २००८ मध्ये येथील रहिवासी तानाजी पावरा यांनी नर्मदा नदीवरून तिनसमाळच्या चारही पाडयांसाठी पाणीपुरवठयाचा प्रस्ताव पाठवला होता. यावेळी सुमारे ५४ लाख रूपये खर्च अपेक्षित होता. मात्र याची दखल न घेतल्याने त्यानंतर सलग चार वर्षापर्यंत खर्च करून प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र सदरचे प्रस्ताव प्रशासनाच्या लालफितीतच अडकल्याने येथील नागरीकांना आजही पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे.

नंदुरबार येथील जिल्हा परिषदेत चार दिवसापुर्वी झालेल्या स्थायी सभेत नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाच्या जलव्यवस्थापन विभागाकडून तिनसमाळ येथे पाणी पोहचण्याचा दावा करण्यात आला. मात्र ही माहिती खोटीच निघाली. यावेळी संतप्त सभापती रतन पाडवी यांनी संबंधित अधिकार्याला धारेवर धरत कानउघाडणी केली. अधिकार्याने पाणी पोहचल्याचा दावा केला असला तरी दुदैवाने आजही तिनसमाळ येथील परिस्थिती जैसे थे आहे. प्रत्यक्षात त्याठिकाणी पाहणी केली असता नर्मदानदी ते पाडयापर्यंतचे अंतर तीन कि.मी.हुन अधिक आहे. मात्र पाणी अवघ्या दिड कि.मी.पर्यंत पोहोचले आहे. यामुळे आजूनही दिड कि.मी.चे पायपीट येथील रहिवाशांना करावी लागत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व प्रशासन प्रत्यक्ष याठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे सातपुडयातील विविध पाण्याचा योजना बारगळत असल्याचे यावरून लक्षात येते. पाणी येईल. या आशेवर तिनसमाळ येथील नागरीक जीव धोक्यात घालून दरीत पाणी आणत आहे.
धडगांव तालुक्यातील तिनसमाळ ग्रामपंचायतीत ग्रामस्थापर्यंत पाणी पोहोचले आहे. ही एक चांगली बातमी आहे. अशी माहिती चार दिवसापुर्वी जि.प.च्या स्थायी सभेत संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी दिली होती. यावेळी पदाधिकार्यांनी कानउघाडणी करत प्रत्यक्षात अधिकारी न जाता व्हिडीओ पाहून सभागृहाची दिशाभूल करण्याचा अधिकारी प्रयत्न करीत आहेत. असे पदाधिकार्यांनी यावेळी सांगितले.
तिनसमाळ येथे पिण्याच्या पाण्यासाठी कधी रात्री तर कधी पहाटे भटकंती करावी लागते. याकडे ना शासनाचे ना प्रतिनिधींचे लक्ष आहे. त्यामुळे कायमच आम्ही दुर्लक्षीत राहिलो आहोत.
मिनाबाई पावरा, तिनसमाळ, रहिवाशी
तिनसमाळ येथे पाणीपुरवठा योजना यशस्वी झाल्याचे संबंधित अधिकारी सांगत असले तरी ही योजना पुर्ण झालेली नाही. ही अर्धापर्यंत पोहोचली आहे. अजूनही आम्हाला दिड कि.मी.पर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे अधिकारी सभागृहात खोटे सांगत आहे. दिड कि.मी.वरून पाणी आणण्यापेक्षा दरीत उतरून एक कि.मी. वरून पाणी आणणे सोयस्कर आहे.
तानाजी पावरा, रहिवाशी, तिनसमाळ

स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तिनसमाळला पाणी पोहचल्याचे सांगण्यात आले . प्रत्यक्षात मात्र पाणी पोहचलेले नाही . यामुळे अधिकाऱ्यांनी खोटे बोलण्याआधी माहिती घेणे अपेक्षित होते .
रतन पाडवी, समाजकल्याण सभापती , जि . प . नंदुरबार









