नंदुरबार l प्रतिनिधी-
संत परंपरेचा अखंड वारसा जपत ब्रह्मलीन संत श्री. दगाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जन्मभूमी चौपाळे ता. जि. नंदुरबार ते जल समाधी स्थळ नर्मदा आशा ता. झगडिया जि. भरूच गुजरात येथील निलोंभी आश्रम दिंडी यात्रेचा १८५ किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास आज भावपूर्ण वातावरणात पूर्ण झाला. नर्मदा तीरावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत जलाभिषेक, आरती, आत्मज्योतीचे विसर्जन आणि महाप्रसादाने या ३३व्या दिंडी यात्रेची भक्तीमय सांगता झाली.
२४ मार्च रोजी संत श्री दगाजी महाराजांच्या जन्मभूमी चौपाळे येथून सुरू झालेल्या या दिंडी यात्रेत दररोज भजन, कीर्तन, नामस्मरण आणि शिस्तबद्ध पायी प्रवासातून भक्तांनी अध्यात्माचा अनुभव घेतला. संपूर्ण प्रवासात गावोगावी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दगाजी महाराज यांच्या पालखीच्या सोबत चालणाऱ्यांचा भाविकांचा आठ दिवसाच्या पायी दिंडीत हरे रामा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे चा जप दिंडीत सहभागी अविरत सुरू होता टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “जय नर्मदे हर”च्या घोषात वातावरण दुमदुमून गेले होते.
३० मार्च रोजी ही दिंडी अशा ता. झगडिया जि. भरूच गुजरात येथील नर्मदा काठावरील निलोंभी आश्रमात दाखल झाली. आज ३१ मार्च रोजी पहाटेपासूनच नर्मदा घाटावर भक्तांची गर्दी उसळली होती. नर्मदा मातेला जलाभिषेक करताना अनेक भाविकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. ब्रह्मलीन संत श्री दगाजी महाराजांच्या आत्मज्योतीचे विसर्जन आणि पादुका पूजनाच्या वेळी संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारावून गेला. यावेळी संतोष चैतन्य महाराज ट्रस्टचे पदाधिकारी सुमुल डेअरीचे चेअरमन भरतभाई पटेल, गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदीशभाई पटेल निझरचे महेंद्र पाटील, अक्राळेचे रोहिदास राठोड आदि सह महाराष्ट्र गुजरात एम.पी. येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत श्री दगाजी महाराज यांनी जिथे जलसमाधी घेतली त्या ठिकाणी नर्मदा पूजन, पादुकाचे पूजन, संतोष चैतन्य महाराज सह ट्रस्टी सपत्नीक पूजेस बसले पूजा विधीवत करण्यात आली. पौरोहित्य नंदुरबारचे प्रसिद्ध भागवतकार अविनाश महाराज व भागवतकार श्याम महाराज मुळे यांनी केले.
या यात्रेदरम्यान व्यसनमुक्ती, शिस्त आणि धार्मिक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात आले. संतोष चैतन्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामजी जाधव यांच्या सहकार्याने दिंडीचे नियोजन उत्कृष्टपणे पार पडले.
भक्तांच्या मते, ही दिंडी यात्रा केवळ प्रवास नसून आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा अनोखा सोहळा आहे. “प्रत्येक पावलागणिक दगाजी महाराजांची आठवण आणि नर्मदेची ओढ जाणवत होती,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
३३ वर्षांची परंपरा जपणारी ही दिंडी यात्रा यंदाही भक्तांच्या मनात श्रद्धा, एकता आणि अध्यात्माची ज्योत प्रज्वलित करून गेली.

नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावित हे आजारी होते त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले.धमडाई ता. नंदुरबार येथील आमदारांचे डॉ. विजयकुमार गावित यांचे कार्यकर्ते रवी वेंकटराव पाटील यांनी दगाजी महाराज यांच्याकडे नवस केला जर डॉक्टर गावित यांची तब्येत चांगली झाली तर दिंडीत सहभाग सहभागी होऊ, त्याप्रमाणे डॉक्टरांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने ते या दिंडीत सहभागी होऊन त्यांनी नवस फेडला.

दहा वर्षापासून ट्रॅक्टर सेवा देत आहे. यात दिंडीत सहभागी भाविकांचे सामान घेऊन शेवटपर्यंत ट्रॅक्टरने पोचवतात त्यांचे आजोबा नारायण मेघजी पटेल यांच्या पासून कुटुंबातील सदस्य या दिंडीत सहभागी होत आहेत. आमची परिस्थिती बेताची होती मात्र आता सुबत्ता आली आहे आम्ही कोणतेही नवस वगैरे केलेला नाही मात्र या दिंडीत सहभागी झाल्यानेच माझ्या कुटुंबाची प्रगती होत आहे. या भावनेपासूनच आम्ही तीन पिढीपासून अविरत या दिंडीत सहभागी होत आहे.
कल्पेश पटेल, निंभोरा, गुजरात.







