नंदुरबार l प्रतिनिधी-
गारपीट आणि वादळ वाऱ्याने नंदुरबार तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मुख्यमंत्री यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी संपर्क करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सुद्धा थेट मुंबईतील रुग्णालयातून व्हिडिओ कॉल द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला आणि अधिकाऱ्यांना जागेवरच सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ तलवाडे इंद्रीहट्टी परिसरात झालेल्या वादळी वारा आणि गारपिट मुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यासोबतच मका गहू पपई या पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी भाजपा माजी खासदार संसद रत्न डॉ हिना गावित यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडे शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त निधी त्वरित मिळावा अशी मागणी केली आहे. या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले.
रुग्णालयातून आमदार डॉ. गावित यांनी शेतकऱ्यांना दिला धीर
माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉल द्वारे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा संदर्भात सूचना केल्या तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासन स्तरावर नुकसान भरपाईसाठी योग्य पाठपुरावा केला जाईल, असे सांगून डॉक्टर गावित यांनी याप्रसंगी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
याप्रसंगी कुषी व महसूल विभागाचे अधिकारी तसेच भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील,शनिश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील, माजी जि.प.सदस्य मुन्ना पाटील, शनिमांडळचे सरपंच विनायक पाटील, शांतीलाल पाटील, रमेश माळी, प्रभाकर पाटील, वसंत खैरनार, रमेश धोबी, चिंधू धनगर, जगदिश पाटिल, योगेश पवार, भटू धनगर, महेंद्र राजपूत, प्रकाश भिल, अंबर राजपूत, विवेक पाटील, सचिन पाटील, केसर राजपूत, भरत सूर्यवंशी यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते








