नंदुरबार l प्रतिनिधी
उधना ते ब्रम्हपूर अमृतभारत एक्सप्रेस या नवीन रेल्वेगाडीच्या धावण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर नंदुरबार रेल्वे स्थानकात ही रेल्वे गाडी आली असता माजी खासदार डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ती पुढे रवाना झाली.
याप्रसंगी अधिक माहिती देताना डॉ.हिना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि केंद्र सरकारचे आभार मानून पुढे सांगितले की देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आता नंदुरबार येथून रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. उधना ब्रह्मपूर एक्सप्रेस मुळे त्यात आणखी भर पडली. या नवीन एक्सप्रेसला देखील नंदुरबार येथे थांबा देण्यात आला आहे त्यामुळे येथून थेट जगन्नाथ पुरीला जाण्यासाठी नंदुरबार येथील भक्तगणांची मोठी सोय झाली आहे.
ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस ही पाच राज्यांना जोडेल: ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात. ट्रेन क्रमांक १९०२१/१९०२२ उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही आठवड्याला सेवा देईल. ट्रेन क्रमांक १९०२१ उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही दर रविवारी सकाळी ७:१० वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:५५ वाजता ब्रह्मपूर येथे पोहोचेल. ही सेवा ५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होईल. ट्रेन क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस ही दर सोमवारी ब्रह्मपूर येथून रात्री ११:४५ वाजता सुटेल आणि २५ ऑक्टोबर २०२५ पासून सकाळी ८:४५ वाजता उधना येथे पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास नाईक, माजी नगरसेवक लक्ष्मण माळी, मोहन खानवाणी, अविनाश माळी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.