नंदुरबार l प्रतिनिधी-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी वास्तव्यास असलेल्या गावांना व आदिवासी समाजाच्या कुटूंबाना विविध योजनांचा लाभ प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियांनाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
केंद्र शासनाने देशातील आर्थिक-सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षित जिल्ह्यामधील आदिवासी कुटुंबाची परिपूर्ती करण्यासाठी “प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियान” योजनेस मंजूरी दिली असून या योजनेसाठी आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वागिण आणि शाश्वत विकासाची खबरदारी घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
यामध्ये आदिवासी समाज ज्या गावांमध्ये वास्तव्यास आहे अशा प्रत्येक गावाचा व त्यातील प्रत्येक आदिवासी कुटूंब व लाभार्थ्याच्या सर्वागिण विकासाच्या दृष्टीकोनातून रस्ते, पक्की घरे, पाण्याची व्यवस्था, विद्युत पुरवठा, मोबाईल मेडिकल युनिट, उज्वला गॅस योजना, अंगणवाडी केंद्र बांधणे, पोषण स्थिती सुधारणे, कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, कृषि विभागाच्या योजनांचा लाभ देणे, मत्सव्यवसाय करण्यास चालना देणे, पर्यटनाचा विकास करणे, शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे इत्यादी विविध प्रकारचे लाभ देण्याची कार्यवाही पुढील पाच वर्षात करण्यात येणार आहे.
एकूण 17 विभागामार्फत 25 उपक्रमांचा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे आदिवासी बहुल गावांचा सर्वागिण विकास होवून समाजाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती उंचावणार आहे.
यासाठी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा व या अभियानात सहभागी व्हावे असेही श्री. पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.