नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा शहरातील बारगळ जमीनींचे मोजमाप करून संबंधितांचे नावे घरे करण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.
ते जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी जिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) गोविंद दाणेज, जिल्हा भूमार्पन अधिकारी स्वाती लोंढे, सहआयुक्त नगरविकास नितीन कापडणीस, तहसिलदार (तळोदा) पंकज घोरपडे, मुख्याधिकारी (तळोदा) विक्रम जगदाळे व संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, तळोदा शहारातील ५ हजार एकरहून अधिक जमीन ही बारगळ संस्थानच्या नावावर आहे. त्यातील १ हजार ६०३ एकर जमीनींवर अतिक्रमणे आहेत. त्यातील जमीनींचे सातबारा व नोंद असलेले व पीआर कार्ड अशा दोन प्रकारच्या जमीनी आहेत. अतिक्रमणे दिनदयाळ उपाध्याय योजना व शबरी घरकुल योजनेत अधिकृत करण्यासाठी त्या जागांचे जागा मालकांकडून मोजमाप करून त्याप्रमाणे मोबदला निश्चित करण्यात यावा. त्यानंतर तो मोबदला संबंधित मालकास शासनामार्फत देवून अतिक्रमण धारकांच्या नावे सातबारा करण्याबाबातची कार्यवाही नियामानुसार करण्यात यावी.
भूमापनापनाच्या नियमानुसार ५०० स्क्वेअर मीटर ची मर्यादा जागेसाठी असून घरासाठी २६९ स्क्वेअर फुट घरकुल बांधकामासाठी मर्यादा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.