नंदूरबार l प्रतिनिधी
तापी बुराई प्रकल्प 23 वर्षापासून रखडला आहे.शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना गांभीर्याने लक्षात यावी म्हणून प्रकल्पाला चालना मिळावी निधी मिळावा यासाठी नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी, शनिमांडळ, रनाळे या तीन मंडळातील 30 पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांनी आज तालुक्यातील रनाळे जवळील वडबारे फाट्यावर दहा वाजे दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले.
तापी बुराई प्रकल्प 23 वर्षापासून रखडला आहे.याबाबत जल संघर्ष समितीने अनेकदा निवेदन दिले.याबाबत समितीतीने आंदोलनाचा इशारा दिला होता.शासनाने जमावबंदी असल्याने रास्ता रोको आंदोलनास परवानगी नाकारली मात्र शांततेत व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करत असल्याने परवानगी देण्याची शेतकरी शिष्टमंडळाने विनंती केल्याने रास्ता रोको साठी अर्धा तासाची परवानगी देण्यात आली होती.
आज सकाळी सकाळी दहा वाजेपासून रास्ता रोको आंदोलनात सुरुवात झाली. तापी बुराई प्रकल्पास 1999 साली मंजुरी मिळाली या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात केले जाणार होते.मात्र अपूर्ण निधी अभावी पहिल्या टप्प्यातील नंदूरबार तालुक्यातील गावातील तलावापर्यंत सुद्धा पाणी पोहोचू शकले नाही. 23 वर्षापासून रखडलेल्या या प्रकल्पाला चालना मिळावी व निधी मिळून कामास लवकर सुरुवात व्हावी. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शासनाने व लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाकडे लक्ष न दिल्याने हा प्रकल्प रखडला असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
यंदाही दुष्काळी परिस्थिती असल्याने या प्रकल्पाचे महत्त्व वाढले आहे. तापी बुराई प्रकल्प पूर्ण झाला असता तर दुष्काळाची झळ कमी असती त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शेतकरी आग्रही आहेत. यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावल यांनी प्रकल्प मोठा असल्याने अनेक विभागातून मंजुरी घ्यावी लागते. प्रकल्पाचा खर्च वाढल्याने नवीन प्रस्ताव तयार करून सादर करण्यात आला आहे.असे सांगितले. मात्र शेतकरी हे मुद्दे मान्य करण्यास तयार नाहीत. प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली नाही तर यापुढे दर पंधरा दिवसांनी आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
या रास्ता रोको आंदोलनात दीपक गवते, दीपक पाटील रनाळे, भास्कर पाटील शनिमांडळ, बलराज पाटील मांजरे ,रावसाहेब गोरख पाटील, सुरेंद्र पाटील कंढरे,चंद्रकांत पाटील भादवड, भरत चकोर रनाळे, छगन पाटील निंभेल, चुनीलाल पाटील घोटाने, सुभाष बाबा घोटाणे, रवींद्र धनगर घोटाणे, प्रकाश पाटील घोटाणे, जितेंद्र राजपूत बलदाने, योगेश दगडू पाटील आसाने, प्रफुल्ल पाटील आसाने, पंढरीनाथ पाटील आसाने ,नरेश पाटील तलवाडे, राकेश सानप रनाळे, संदीप पाटील वैदाणे, तसेच या रास्ता रोको आंदोलनात माजी मंत्री हेमंत देशमुख ,दोंडाईचा नगराध्यक्ष रवींद्र देशमुख, बिपिन पाटील, प्रमोद पाटील सैताने ,बी. के. पाटील, सयाजी मोरे, नितीन जगताप आदी लोकप्रतिनिधी पदाधिकारी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय महाजन,नंदूरबार तालुका पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.