नंदूरबार l प्रतिनिधी
आपले आजोबांसोबत शेतातून घरी परत येत असलेल्या एका दहा वर्षीय बालकावर पाठीमागून येऊन बिबट्याने हल्ला केला. यात बालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दलेलपूर शिवारात घडली. याप्रकरणी वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून पोलीसातही नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रानमहू ता तळोदा येथील खेत्या पारशी वसावे व त्यांचा नातू गुरुदेव भरत वसावे हे आपल्या मालकीचे औत घेऊन दलेलपूर शिवारात शेतमालक गुलाब सत्तार धानका यांच्या कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी गेले होते. कोळपणी संपल्यानंतर आजोबा व नातू आपल्या रानमहू गावाकडे येत असतांना एका उसाच्या दबा धरून बसलेल्या बिबट्याने गुरुदेव या दहा वर्षीय बालकावर जबर हल्ला करून त्यास उसाच्या शेतात फरफटत नेले.
हाप्रकार आजोबा खेत्या वसावे यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी बिबट्यावर काठीने वार केले. बिबट्याने सदर बालकास तेथेच सोडून पळ काढला. परंतु सदर बालकाच्या चेहऱ्यावर व मानेवर बिबट्याने गंभीर जखमा केल्याने अधिक रक्तस्राव झाला होता. आजोबा व वडिलांनी बालकास उसाच्या शेतातून काढून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
ही घटना वन विभागास माजी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे यांनी कळवल्यानंतर उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील ,वनक्षेत्रपाल स्वप्निल भामरे, वनरक्षक वासुदेव माळी व वन कर्मचाऱ्यांनी रानमहू गावाकडे धाव घेतली व घटनास्थळी भेट दिली. शिवाय घटनेच्या पंचनामाही केला. दरम्यान खेत्या वसावे यांनी सदर घटनेबाबत पोलिसात खबर दिल्यावर तळोदा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालक मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यानंतर पिंजरा लावण्याची कारवाई सुरू केली आहे. यापूर्वीही बिबट्या व मादीच्या सतत मुक्त संचार सुरू आहे. एवढेच नव्हे अगदी दिवसाढवळ्या देखील दोन तीन बिबटे हिंडताना दिसून येतात त्यामुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.
आमदार राजेश पाडवी यांनी माहिती कळताच उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देत त्यांनी वनविभागालाही कारवाई करण्याचे सूचित केले. दरम्यान विधिमंडळातही आमदार राजेश पाडवी यांनी बिबट्याचा हल्ला व त्यामुळे होणारे नुकसान यावर आवाज उठवला होता मात्र वनविभाग कारवाई करत नसल्याने यावर तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.