नंदूरबार l प्रतिनिधी
मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टीची राज्यभर निदर्शने करण्यात आली असून दोषींना कडक शिक्षा करावी या मागणीचे निवेदन नवापूर तहसीलदारांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे.हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलेली नाही, आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
मणिपूर येथील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर घटने बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरत आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे,
मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात तीव्र निदर्शने केली आहेत, केंद्र भाजपा सरकारने लवकरच मणिपूरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी. तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली.निवेदनावर जिल्हाध्यक्ष रवि गावित, जिल्हा संघटक मंगेश येवले, जिल्हा सचिव अरविंद वळवी, कांतीलाल गावित यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








