नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.दंगली, भ्रष्टाचार, बेरोजगारी असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना राज्य सरकार जनतेच्या पैशातून स्वतःची प्रसिध्दी करीत आहेत.नुसते फोटो सेशन करुन जनतेचा पोटापाण्याचा प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
नंदुरबार येथील व्ही.जी.राजपूत लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते.पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सद्या राज्य शासन जनतेच्या पैशातून स्वतःची प्रसिध्दी करीत आहेत.नुसते फोटो सेशन करुन जनतेचा पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नाही. नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतर, बेरोजगारी, कुपोषण अशा अनेक समस्या आहेत. यामुळे लगतच्या स्थानिक नर्मदा व तापी नदीच्या पाण्याचे योग्य उपयोग केल्यास शेती बागायती होवून रोजगार उपलब्ध होणार आहे. आघाडीचे सरकार असतांना उपसा सिंचन योजनांना गती देण्यात आली. मात्र त्यानंतरच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. तुम्ही जास्तीत जास्त आमदार निवडून दिले तर मुख्यमंत्री होता येईल व त्यानंतर तापी-बुराई सिंचन योजना मार्गी लावता येईल, असेही पवार म्हणाले. दरम्यान, जलजीवन मिशन ठेकेदारांच्या सोयीसाठी चालविलेली योजना असून मोठ्या प्रमाणावर यात भ्रष्टाचार असल्याचा आरोपही श्री.पवार यांनी केला. तसेच घरकुलाबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष असून लाभार्थी वंचित आहेत.
नंदूरबार जिल्ह्यात दोन वर्षात सुमारे दीड हजारांहून बालमृत्यू व मातामृत्यू झाले आहेत. देश अमृत महोत्सवी वर्ष तर नंदुरबार जिल्हा निर्मितीची रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असतांना येथील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. येत्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीत देखील एकी ठेवावी लागणार आहे. यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात राष्ट्रीय नेत्यांना धमकी दिली जाते तर सर्वसामान्यांचे काय? देशात व राज्यात नेमके काय सुरु आहे? असा सवाल उपस्थित करत कायदा आणि सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारपणे वागण्याचेही आवाहन अजित पवार यांनी केले.
नंदुरबार जिल्ह्यात एक वेळ राष्ट्रवादीची मजबूत स्थिती होती. मात्र उलथापालथी होतात. यातूनच नवीन कार्यकर्ते तयार होत असून त्यांना संधी मिळाल्यास ते विकासाचा ध्यास घेतात. जिल्ह्यात राष्ट्रवादीची फळी मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावागावात बुथ कमिट्या तयार करुन सरकारच्या ज्या योजना दुर्गम भागात पोहचत नाहीत त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावागावात पोहचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहीजेत. मध्यंतरीच्या निवडणूकांमध्ये काही जागा निवडून आल्या असल्या तरी त्यावर समाधान न मानता आणखी काम करण्याची संधी आहे. सन १९९८ मध्ये सत्ता असतांना जिल्हा निर्मिती केली. तसेच वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करुन दिले.

जिल्ह्यात विकासाचे विविध योजना याव्यात यासाठी आदिवासी विकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यातून केवळ जिल्ह्याची आर्थिक उन्नती व्हावी ही प्रामाणिक भावना असल्याचे ना.पवार म्हणाले. जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थिती असतांना पक्ष संघटनासाठी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे करीत असलेल्या कामाचे कौतूक केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी नंदुरबार, शहादा, तळोदा या विधानसभा मतदार संघात सर्वे झाला असून त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार असल्याने राष्ट्रवादीसाठी या जागा देण्यात याव्या, अशी मागणी केली. तसेच रस्ते कामात मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात भ्रष्टाचार झाला असून त्याबाबत लक्षवेधी उपस्थित करुन संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली .
दरम्यान, प्रास्ताविक करतांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्ष संघटन मजबूत केले असून कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचा प्रयत्न केला आहे. कमी दिवसात राष्ट्रवादीची पुन्हा भक्कम स्थिती जिल्ह्यात निर्माण झाल्याने येत्या विधानसभा निवडणूकीत दोन जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केले.
जि.प.सदस्य मोहन शेवाळे यांनी जिल्ह्यातील कुपोषण, स्थलांतर, बेरोजगारी असे विविध प्रश्न मांडत शहादा-तळोदा मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्याची मागणी केली. याप्रसंगी नंदुरबार पालिकेचे माजी प्रतोद मोहन माळी तसेच सीमा सोनगीरे, तुषार सनंसे, सिताराम पावरा, दानिश पठाण, डॉ.जितेंद्र भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. कॉँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला जिल्हा निरीक्षक नाना महाले, मधुकर पाटील, हितेंद्र क्षत्रिय, संदिप परदेशी, सुरेंद्र कुवर, डॉ.नितीन पवार, ॲड.अश्विनी जोशी, अल्का जोंधळे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.