अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसह विविध विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या कामांतून पावसाळा तोंडावर येऊनही अपेक्षित रोजगार न मिळाल्याने आमदार आमश्या पाडवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत रोजगारासाठी होणारे आदिवासी मजुरांचे स्थलांतर व त्यातून होणारी पिळवणूक कधी थांबेल उद्विग्न मनाने असा सवाल करुन जे अधिकारी काम करणार नाहीत त्यांना सोडणार नाही असा सज्जड दम देत “मी शांत बसणारा ,आराम करणारा पुढारी नाही ,मला काम पाहिजे. जो काम करणार नाही त्याची रितसर तक्रार करून त्याला घरी पाठवेल. “असा इशारा आमदार आमश्या पाडवी यांनी दिला.
तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी “आमदाराची वारी ,आपल्या दारी “या आमदार आमश्या पाडवी यांच्या संकल्पनेतून येथील तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात आमदार आमश्या पाडवी बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती गणेश पराडके, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी पुलकित सिंह, पंचायत समिती सभापती नानसिंग वळवी, अक्कलकुवा गृप ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा बोरा, पोलीस निरीक्षक राजेश गावित, निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती टेडग्या वसावे, शेतकरी सहकारी संघाचे व्हाईस चेअरमन अशोक पाडवी, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ललित जाट, शेतकरी सहकारी संघाचे संचालक लक्ष्मण वाडीले,युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख मालती वळवी, नगरसेवक विजय ब्राम्हणे, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलसिंग वळवी आदी उपस्थित होते.
विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी त्यांच्या संकल्पनेतुन तालुक्यातील शासकीय कार्यालयात चक्रा मारणाऱ्या सामान्य जनतेच्या समस्या विना विलंब सोडविण्यासाठी तसेच जनतेचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आमदाराची वारी आपल्या दारी या उपक्रमानुसार जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार अक्कलकुवा तहसील कार्यालयात जनता दरबार संपन्न झाला. या दरबारात तालुक्यातील विविध विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते. त्यांनी आपल्या विभागाचा आढावा सादर करून विभागा संदर्भातील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या आमदार आमश्या पाडवी तसेच तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या सूचनानुसार योग्य ती कार्यवाही करून सोडविण्यात आल्या. यावेळी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सुरक्षा मागण्यासाठी आलेल्या नागरिकांना शहरातील प्रतिष्ठित व्यापारी याने मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली.
याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही संबंधितांवर कुठलीही कारवाई झाली नसल्याने आमदार आमश्या पाडवी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून दोषींवर त्वरित कारवाई न केल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे सांगितले. सरपंच विनोद वळवी यांनी देखील विविध समस्या मांडल्या काकडखुंट येथे जलजीवन मिशन अंतर्गत केवळ उद्घाटन करून अद्याप पर्यंत कामाला सुरुवात न झाल्याने हे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली. शेतकरी सहकारी संघाचे संचालक लक्ष्मण वाडीले यांनी विविध समस्या मांडून खापर येथील विश्रामगृह गेल्या अनेक वर्षापासून धूळखात असून कुठल्याही उपयोगात नसतांना त्याची दुरुस्ती करून लाखो रुपयांचा निधी लाटल्याची तक्रार करुन सदर शासकीय विश्रामगृह अद्ययावत करण्याची मागणी केली. तुकाराम वळवी यांनी अक्कलकुवा शहरातील मोलगी रस्त्यावरील रहदारी सुरळीत करण्याची मागणी केली.
तसेच मोलगी येथील मुख्य बाजारपेठेत दररोज होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराच्या बाहेर उभे करण्यात यावे अशी मागणी केली. सरपंच विनोद वळवी व शिवसेना जिल्हा युवा प्रमुख ललित जाट यांनी देखील समस्या मांडल्या वयोवृद्ध लोकांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी हयातीच्या दाखल्यासाठी वणवण करावी लागत आहे ती दूर करावी तसेच तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये होणारी ग्राहकांची हेळसांड थांबवावी अशी संतप्त मागणी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काना नाईक यांनी अक्कलकुवा शहरातील सर्व अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी केली.तसेच शहरातील अतिक्रमण काढणाऱ्या नवीन गटविकास अधिकारी यांनी चांगली कारवाई केली आहे.असे सांगून त्यांना दोन महिने येथेच आपला सेवाकाळ वाढवून घ्यावा असे शेतकी संघाचे संचालक लक्ष्मण वाडीले यांनी आवाहन केले.

आमदार आमश्या पाडवी यांनी गटविकास अधिकारी पुलकित सिंह यांनी केलेल्या कारवाई बद्दल अभिनंदन केले. जल जीवन मिशनची तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर झाली असून ती अद्याप पर्यंत सुरू न झाल्याने ती पावसाळ्या पूर्वी सुरू करण्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील वाण्याविहिर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून ते लवकर पूर्ण करून परिसरातील रुग्णांसाठी लवकरात लवकर सुरू करावे तसेच जमाना येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम देखील पूर्ण होऊन ते देखील अद्याप पर्यंत ताब्यात घेण्यात आलेले नाही.
त्यातील त्रुटी त्वरित पूर्ण करून तेही सुरू करण्यात यावे अशा सूचना आमदार आमश्या पाडवी यांनी यावेळी केल्या. या जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी मांडलेल्या समस्या त्वरित सोडविण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला पुरुष नागरिक जनता दरबारात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार अजित शिंत्रे नायब तहसीलदार चौरे, अव्वल कारकुन राजरत्न सोनवणे, तलाठी गावित आदींसह महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या जनता दरबारात तालुक्यातील देवगोई घाटात गतवर्षीच्या पावसाळ्यात कोसळलेल्या दरडी वेळोवेळी पत्रव्यवहार करून अद्याप पर्यंत हटविण्यात आलेल्या नसल्याने आमदार आमश्या पाडवी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.दरडीमुळे अपघात होऊन जीव गेल्यास संबंधितांवर मनुष्यवधाचे गुन्हे नोंदविण्यात येतील असे स्पष्ट पणे अधिकाऱ्यांना सुनावले या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग एकमेकांकडे बोट दाखवीत होते त्यांनाही चांगलेच खडसावले. कुपोषण संपविण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याचे सांगितले.