अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची पहिली सभा बाजार समितीच्या कार्यालयात मोठया उत्साहात संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती विधान परिषदेचे सदस्य आ. आमश्या पाडवी हे होते. बैठकीला उपसभापती टेडग्या वसावे, संचालक काना नाईक, तुकाराम वळवी, दिलीप चौधरी, करणसिंग पाडवी, कुवरसिंग पाडवी, ललिता वळवी, धरमसिंग पाडवी, राजेश तडवी, मनिषा तडवी, यशवंत नाईक, स्वप्निल जैन, आदी उपस्थित होते.या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संचालक काना नाईक यांनी अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती व पशुपालन असल्याने या सोबत निगडीत असणाऱ्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना आपल्या कडील बैल, शेळ्या ,कोंबड्या आदी जनावरे विक्री किंवा खरेदीसाठी जिल्ह्यातील इतर बाजारपेठेत जावे लागते त्यासाठी अक्कलकुव्याच्या आठवडे बाजाराच्या दिवशी बाजार समितीने बैल बाजार भरवावा तसेच ज्या व्यापाऱ्यांकडे शेतमाल खरेदी करण्याचा परवाना ज्या ठिकाणाचा आहे.
तेथेच त्यांनी दुकान लावावे व ज्या व्यापाऱ्यांकडे शेत माल खरेदीचा परवाना नाही ते अनधिकृतपणे दुकान लावुन शेतमाल खरेदी करुन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणुक करतात त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत अशी लेखी सुचना मांडली त्यानुसार येत्या बुधवार पासुन आठवडे बाजाराच्या दिवशी बैल बाजार भरविण्यास संमती देण्यात आली. तसेच अनधिकृत पणे शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
तर सभापती आमदार आमश्या पाडवी यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीचे मानधन,प्रवास भत्ता, व इतर भत्ते घेणार नसल्याचे लेखी पत्र देऊन बाजार समितीच्या विकास कामां बाबत योग्य नियोजन करण्याच्या सुचना केल्या. याप्रसंगी बाजार समितीचे सचिव दिपक हिरे यांनी बाजार समितीच्या विविध उपक्रमा बद्दल संचालकांना माहिती दिली.बैठकीला बाजार समितीचे ,जितेंद्र माळी, प्रशांत गुरव, विजय मराठे आदी हजर होते.








