नंदुरबार l
नवरात्रोत्सवात उपवासाच्या काळात बहुतांश भाविक साबुदाणा, भगरीचे सेवन मोठया प्रमाणात करतात.यापुर्वी घडलेल्या विषबाधेसारख्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी उपवासाचे पदार्थ, भगर, साबुदाणा खरेदी करतांना परवानाधारक, नोंदणीधारकाकडूनच पॅकबंद असलेले उपवासाचे पदार्थ खरेदी करावे, असे आवाहन आवाहन अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे यांनी केले आहे.
नागरीकांनी भगर व उपवासाचे पदार्थ खरेदी करतांना परवानाधारक, नोंदणीधारकाकडुनच पॅकबंद असलेली भगर व उपवासाचे पदार्थच विकत घ्यावेत. भगरीसह उपवासाचे पदार्थ असलेल्या पाकीटावर उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर तपासून खरेदी करावी. पाकीटावर प्रक्रीया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले याचा तपशील असतो.
तो निट पाहून घ्यावा. तसेच ‘बेस्ट बिफोर’ अर्थातच भगरीची अंतीम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते तेही तपासुन व खात्री करूनच भगर खरेदी करावी. भगरीचे सुटे पीठ खुल्या बाजारातून विकत घेऊ नये. बाजारातून पॅकबंद भगरीच्या खरेदीनंतर स्वच्छ करुन व नंतर स्वच्छ धुवून त्यानंतरच पीठ तयार करावे. खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे.सकाळी बनविलेली भगर रात्री सेवन करु नये.
भगर व इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत व ते तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करण्यात यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.








