नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार- खांडबारा रस्त्यावरील बिज्यादेवी गावाजवळ घडलेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर बिज्यादेवी गावाजवळील हॉटेल आदित्यजवळ काल दि.२४ सप्टेंबर रोजी ७. १५ मिनीटांनी ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१९-४९१८) व मोटरसायकलचा अपघात झाला. यात बिज्यादेवी येथील दिलीप सुदाम देसाई (३९) रा.बिज्यादेवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना (१०८) रूग्ण वाहिकेने नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर त्याठिकाणी पोलीसांना उशिरा माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी पोहचू शकले नाही. त्यानंतर सुमारे ८.४० वाजेच्या दरम्यान अपघातग्रस्त ट्रॅक्टर तसेच उभे असल्याने त्यावर मोटरसायकलस्वार आदळून दुसरा अपघात घडला. या अपघातात रेल्वे कर्मचारी लक्ष्मण बाजीराव कोकणी (३०) रा.झामटयावड (ता.नवापूर) यांना दुखापत झाली. उपचारा दरम्यान या युवकाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. एकाच ठिकाणी अपघात झाल्यानंतरही त्याठिकाणाहून ट्रॅक्टर हटविण्यात आले नसल्याने युवकाला आपला प्राण गमवावा लागला. असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान दोन अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त गावकर्यांनी सदर अपघातग्रस्त ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.









