खेतिया l प्रतिनिधी
खेतिया येथील तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी संतप्त नागरिकांनी आरोग्य केंद्रात रोष व्यक्त केला खेतियामध्ये सर्पदंशावर उपचार मिळू शकला नाही ही मोठी शोकांकिका आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खेतिया येथील तरुण शेतकरी अनिल काशिनाथ पवार (मराठे)( वय 38 वर्ष ) यांना शेतामध्ये काम करीत असताना विषारी सर्पांने दंश केल्यामुळे तो तात्काळ खेतिया येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी आला. प्राथमिक उपचार करून त्यांना पानसेमल येथे पाठविण्यात आले. पानसेमल येथे उपचार केल्यानंतर त्यांना बाहेर बडवानी किंवा शहादा येथे उपचार घेण्यासाठी जाण्यास सांगितले परंतु खेतिया येथे पोहचण्यापूर्वी अनिल पवार (मराठे) यांचा मृत्यू झाला. उपचाराअभावी मृत्यू झाल्यामुळे संतप्त नागरीकांनी आक्रोश व्यक्त करीत प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या संख्येने उपस्थित झाले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सूचना दिली.

सदर घटनेची माहिती कळताच एसडीएम अंशु जावला यांनी तहसीलदार राकेश सस्तिया, अतिरिक्त तहसीलदार हुकुमसिंग निंगवाल यांना निर्देश दिले. त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले असता त्याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित संतप्त नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. यावेळी प्रशासनिक अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र खेतिया येथे पाहणी केली असता त्याठिकाणी सर्पदंशाचे इंजेक्शन “स्नेकबाईट” उपलब्ध असतांना देखील अनिल पवार (मराठे) यास इंजेक्शन लावण्यात आले नाही. त्यानंतर उपस्थित हजारो नागरीकांनी आक्रोशीत होऊन अनिल जवळ झालेल्या अन्यायासाठी तहसीलदार यांना संतप्त नागरिकांनी निवेदन दिले व मागणी केली की, प्राथमिक आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कार्यवाही करावी असे निवेदन देण्यात आले.
यावेळी तहसीलदार राकेश सस्तिया, अतिरिक्त तहसीलदार हुकुमसिंग निंगवाल यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. त्यावेळी संतप्त नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे अनिलचा मृत्यू झाला. यावेळी संपूर्ण स्टाफ ची बदली करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.
यावेळी तहसीलदार यांनी प्रशासनिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेची माहिती प्रशासनाला देऊन त्यावर एक कमिटी गठीत करण्यात आली असून सखोल तपास करण्यात येईल. अनिल पवार (मराठे) हा अत्यंत नाजूक परिस्थितून गरीब होतकरू तरुण होता व आपले जीवन शेती करून निर्वाह करीत होता.
परंतु त्याच्यावर काळाने क्रूर घात केला व सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला. अनिल हा अत्यंत शिस्तप्रिय व मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा मित्र परिवार ही मोठा होता. नाजूक परिस्थिती असून ही संकटकाळी सुखदुःखात मदत करणारा होतकरू तरुण होता. तो बास्केटबॉल, क्रिकेट, कब्बडी चा उत्कृष्ट खेळाडू होता. परिवाराचा एकुलता एक असून अत्यंत जबाबदारीने कार्य करायचा. त्याच्या पश्चात म्हातारे आई, वडील, पत्नी, 1 मुलगी, 4 बहीण असा परिवार आहे. सदर घटना कळताच खेतिया व परिसरात सर्वत्र शोककळा पसरली. अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी साश्रूनयनांनी श्रद्धांजली वाहिली.








