नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मासलीपाडा शिवारात बर्डीपाडा येथील शेतकरी आपल्या शेतात पायी चालत जात असताना भरधाव वेगाने मागून येणाऱ्या पिकपने धडक दिल्याने शेतकरी सुदाम गावित यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सुदाम जोलक्या गावित (वय 50) रा. बर्डीपाडा, ता.नवापूर यांचे शेत महामार्गाच्या पलीकडे मासलीपाडा शिवारात असल्याने सकाळी आपल्या शेतात कामानिमित्त जात असताना सुरतहुन धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहन (क्र.एम. एच.०४, ई. वाय.२४१७ ) वाहन चालकाने खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याच्या कडेने पायी चालत जाणारे शेतकरी सुदाम गावित यांना मागून जबर धडक देत पिकप वाहन अंगावरून चढवत फरपट नेल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर पिकप वाहन चालक देविदास रतन पाटील रा. बांबुर्ली खंडाला, जिल्हा धुळे याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करून वाहन थांबविले. असता चालकाने उतरून ऊसाच्या शेतामधून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
खाली कोसळलेल्या सुदाम गावित यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, असून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांना मृतदेह ताब्यात दिल्यावर बर्डीपाडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहे.
घटनास्थळी विसरवाडी पोलीस जमादार दिलीप गावित, कॉन्स्टेबल दारासिंग पावरा यांनी दाखल होत, पंचनामा केला असून मयताचा मुलगा रसिक सुदाम गावित यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिलीप गावित हे करत आहे. पिकअप वाहन चालकाच्या चुकीमुळे घरातील कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने मयताच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.








