नंदुरबार l प्रतिनिधी
निपुण भारत मिशन अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान प्रभावी अंमलबजावणीसाठी भाषा व गणित विषयाच्या घटक संच उपयुक्ततेबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे दिनांक 18 जुलै रोजी भाषा विषयाची व 19 जुलै रोजी गणित विषयाची कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील 95 केंद्रातील प्रत्येकी एक भाषा व गणित विषयाचे तज्ञ शिक्षक सहभागी होते . या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी तसेच वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी* यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी विद्यार्थ्यांना शिकवणे यापेक्षा विद्यार्थ्यांचे शिकणे यावर भर देण्याबाबत आवाहन केले. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान महत्वपूर्ण ठरेल,
यासाठी सर्व शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांनी एकत्रित प्रयत्न करून प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतांमध्ये वृद्धी व्हावी यासाठी नाविन्यपूर्ण कार्य करण्याची गरज स्पष्ट केली. तसेच या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी निपुण भारत सरकारची निपुण मार्गदर्शिका व महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या 50 दिवसीय उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.
निपुण भारत अंतर्गत जिल्हास्तरीय सुकाणू समिती व जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्ष यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करणवाल डॉ. मैनक घोष यांच्या मार्गदर्शनातून सदर कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
सदर दोन दिवशीय कार्यशाळेतून केंद्रस्तरीय सुलभकांना घटक संचातील कृतींची सविस्तर माहिती,विविध साहित्यांच्या उपयोगासह स्पष्ट करण्यात आली. सदर कार्यक्रम ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या काळात मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान कार्यक्रमाचे नियोजनबद्ध कृतींचा संच जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपालिका प्राथमिक शाळा, शासकीय आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळा अंतर्गत इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गासाठी राबविण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी अधिव्याख्याता सुभाष वसावे यांच्यासह जिल्हास्तरीय सुलभक संदीप पाटील, अनंत सूर्यवंशी, रविकिरण सोनवणे ,विशाल चव्हाण, धीरज खैरनार ,कल्पेश गोसावी, हमीद खाटीक, रोहिणी पाटील, रोहिणी बाविस्कर, चेतना चावडा, सुनंदा भावसार, गीतांजली भोई , जयश्री सानप, जयश्री सैंदाणे, रेखा दुरंगी, सोनल बोरसे यांच्यासह तांत्रिक सहाय्य प्रमोद बागले व गोविंद वाडीले यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांनी प्रत्येकी एक रोप लावून वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम राबविला. सर्वप्रथम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, वरीष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, पंढरीनाथ जाधव, डॉ. वनमाला पवार, सुभाष वसावे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा प्रारंभ करण्यात आला.








