नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील श्रीरामपूर येथे आज महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त गावात वृक्ष दिंडी काढून माझी वसुंधरा अभियान टप्पा तीन चा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. श्रीरामपूर ता. नंदुरबार या ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात सहभाग घेतला आहे .त्या अनुषंगाने आज दिनांक १ जुलै 2022 रोजी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा पवार , वनपाल वर्षा चव्हाण तसेच गावाचे सुपुत्र व कणकवली येथे कार्यरत असलेले नायब तहसीलदार आर.जे .पवार विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे यांच्या उपस्थितीत गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थी यांना वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन याचे महत्त्व पटवून देण्यात आले .
यानंतर नायब तहसीलदार आर .जे. पवार यांनी विविध प्रकारच्या भेट दिलेल्या 100 , सेवानिवृत्त कर्मचारी करम गायकवाड यांनी 25, दयाराम गायकवाड यांनी 25 तर वन विभागामार्फत 100 असे एकूण २५० वृक्षांची स्मशानभूमी व परिसरात लागवड करण्यात आली .यावेळी गट विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनीही त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीस 100 वृक्ष भेट देण्याचे जाहीर केले.
वृक्षदिंडीत शाळेचे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते . यावेळी माजी सरपंच विमलबाई गांगुर्डे शत्रुघ्न गांगुर्डे , रुस्तुम गुरुजी , पोलीस पाटील चंदू गायकवाड , ग्रामसेविका रुपाली देवरे ,शिक्षक सोनवणे , कुलकर्णी ,देवरे ,वाडीले आदींसह अंगणवाडी सेविका , मदतनीस , आशा वर्कर उपस्थित होते.