नंदुरबार l प्रतिनिधी
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात 25 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषि संजीवनी मोहिम राबविली जाणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
या कालावधीत प्रत्येक दिवशी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन नवीन तंत्रज्ञानांचा प्रचार व प्रसार करताना शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानांचा अवलंब करावा यासाठी प्रयत्न करणार आहेत.
यात 25 जुन रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार व मुल्यसाखळी बळकटीकरण दिन, 26 जुन रोजी पौष्टिक तृणधान्य दिन, 27 जुन रोजी महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन, 28 जुन रोजी खत बचत दिन, 29 जुन रोजी प्रगतशील शेतकरी संवाद दिन, 30 जुन रोजी शेतीपूरक व्यवसाय दिन व 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येणार असून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
सप्ताहादरम्यान कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था यांनी संशोधित केलेल्या अद्ययावत कृषी तंत्रज्ञान व कृषी विषयक इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसेच कृषि विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना व्हॉटसॲपवर मिळण्यासाठी सुविधा विकसित करण्यात येणार आहे.
तसेच युट्यूब वर शेतकऱ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येतील. मोहिमेत कृषि विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय,पशुसंवर्धन दुग्धविकास विभाग, मत्स्यविभाग, खादी ग्रामोद्योग विभाग व स्वंयसहायत्ता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.