नंदुरबार l प्रतिनिधी
ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी प्रणित ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार शाखेतर्फे सोमवारी रथसप्तमी निमित्त नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवासी आणि रेल्वे अधिकाऱ्यांना तिळगुळ वाटप करून सुसंवाद साधण्यात आला.
प्रतीवर्षी ग्राहक पंचायत आणि प्रवासी महासंघातर्फे रथसप्तमीचे औचित्य साधून प्रवाशांना तिळगुळ वाटप करण्यात येतो. यापूर्वी बसस्थानकावरील प्रवाशांच्या भेटी घेऊन उपक्रम राबविण्यात आला. यंदा मात्र रेल्वे स्थानकावरील कर्तव्य बजावणारे प्रमुख अधिकारी आणि प्रवाशांशी हितगुज साधण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी रथसप्तमीनिमित्त स्टेशन उपधीक्षक प्रमोद ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे विभागातील अधिकारी आणि पोलीस विभागातील प्रमुख अधिकारीची प्रातिनिधिक स्वरूपात भेट घेऊन गुलाब पुष्प देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच सुरत भागल्पुर आणि ताप्ती गंगा एक्सप्रेस मधील सर्व रेल्वे प्रवाशांना रथसप्तमी निमित्त तिळगुळ वाटप करून आनंद द्विगुणित करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, ग्राहक पंचायतच्या तालुकाध्यक्षा अबोली चंद्रात्रे, सुरेश जैन, ॲड. निलेश देसाई, अडवोकेट निता देसाई, पुनम भावसार, योगेश्वर जळगावकर, सेवानिवृत्त गट विकास अधिकारी बी.डी. गोसावी, निवृत्त वीज अधिकारी अनिल बरे, राजेंद्र पगारे गोरखनाथ बावा, वासुदेव माळी आदींसह ग्राहक पंचायत आणि प्रवासी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. मकर संक्रांति ते रथसप्तमी दरम्यान स्नेहमिलन अर्थात तिळगुळ वाटपाचा उपक्रम संपूर्ण राज्यात प्रवासी महासंघातर्फे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी दिली.