नंदुरबार l प्रतिनिधी
कोविड-19 च्या अनुषंगांने शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनचे नियमित वर्ग सुरु करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी परवानगी दिली आहे.
कोविड-19 संदर्भात केंद्र सरकार, राज्य शासन, जिल्हा प्राधिकरण आणि स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे तसेच मार्गदर्शन सूचनाचे पालन करणे बंधनकारक असेल. अठरा वर्षांवरील विद्यार्थी ज्यांनी कोव्हिड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत तेच विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहू शकतील. याची जबाबदारी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील प्राचार्य व केंद्र प्रमुखावर राहील.
शासकीय तंत्रनिकेतनाचे वर्ग 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरु करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनियम करुन विद्यापीठांनी त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा. तसेच कोविड-19 प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करणेसाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधुन नियामानुसार आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना कराव्यात. शासकीय तंत्रनिकेतन येथे सामाजिक अंतर राखणे, स्वच्छतेच्या निकषांचे पालन करणे, चेहऱ्यावर मास्क लावणे, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना बंधनकारक राहील. शासकीय तंत्रनिकेतन व वर्गाचे निर्जंतुकीकरण करावे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनिंग, हॅण्डवॉश, सॅनेटायझरची व्यवस्था करावी.
‘कोविड 19’ साथरोग संबंधित सर्दी, खोकला, ताप, श्वसन संस्थेशी संबंधित लक्षणे असणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शासकीय तंत्रनिकेतन व विभागांच्या वर्गात प्रवेश करु नये. ज्या विद्यार्थी, विद्यार्थींनींनी प्रत्यक्ष शासकीय तंत्रनिकेतनात उपस्थित राहता येणार नाही. त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
ज्या विद्यार्थी, विद्यार्थींनींनी ‘कोविड-19’ ची लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, विद्यापीठाने संबंधित संस्थाचे प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेकडून स्थानिक प्राधिकरणांशी जिल्हा समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच तंत्रनिकेतन विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे देखील लसीकरण करावे. ‘कोविड-19’ विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव होणार नाही या दृष्टिकोनातून आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असेही जिल्हाधिकरी श्रीमती खत्री यांनी आदेशात नमूद केले आहे.








