नंदुरबार l प्रतिनिधी-
बूथ मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे बूथ क्षेत्रातील मतदार याद्या मतचोरी होऊ नये म्हणून नीट तपासून घ्यावी, एकाच पत्त्यावर किती मतदारांची नोंदणी झालेली आहे हे तपासून प्रत्येक मतदाराची खात्री करून घ्यावी. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या निवडणूक आहेत. त्यांचा सन्मान करण्याची वेळ आहे असे प्रतिपादन भाई नगराळे यांनी केले.
नंदुरबार जिल्हा व तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी भाई नगराळे उपस्थित होते. यावेळी खा.ऍड.गोवाल पाडवी,माजी मंत्री ऍड.के.सी.पाडवी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस प्रा.प्रकाशराव सोनवणे, नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, राजेंद्रकुमार गावित, किसान सेलचे प्रदेश चिटणीस देवाजी चौधरी, पंडित पवार, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ वळवी, दिशा समितीचे सदस्य खंडेराव पवार, माजी न.पा.सदस्य इकबाल खाटीक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून स्थानिक पातळीवर आघाडीमधील पक्षांबरोबर चर्चा करावी आणि ठराव करावा अशी श्रेष्ठींची इच्छा आहे. कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेच्या विरोधामध्ये कोणीही जाऊ नये असा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर युतीमधील कोणत्याही पक्षाशी तडजोड करू नये असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र प्रदेश पातळीवरून देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेसाठी प्रत्येक तालुका आणि तेथील परिस्थिती लक्षात घेऊन आणि राज्य तसेच देश पातळीवरील मुद्दे घेऊन जाहीरनामा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पक्षाच्या तालुकावर बैठका झाल्यानंतर प्रत्येक गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रभारी आणि विधानसभा निरीक्षक उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक दिलीप नाईक यांनी केले. राजेंद्रकुमार गावित यांनी सर्वांचे आभार मानले.








