नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे फार्म भरण्यासाठी नेटवर्कचा शोधत वेहगी,बारीपाडा ता अक्कलकुवा येथील माता-भगिनींना डोंगर माथ्याचा आधार घ्यावा लागतो.
महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यातील माता-भगिनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व स्तरातून पुढाकार आवश्यक असल्याचे शासनाने म्हटले आहे.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. महिला व मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर रोजगार निर्मितीस चालना देणे, महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे, महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र राहिलेल्या तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण, सक्षम बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रूपये दिले जाणार आहे. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे. याचाच अर्थ त्या महिलेला 1 वर्षात 18 हजार रूपये मिळणार आहेत.
या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना घेता यावा यादृष्टीने आपल्या शासनाने अनेक अटी शिथिल करत या योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. या योजनेअंतर्गत आता 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत.
यामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. ग्रामीण दुर्गम, डोंगराळ भागातील महिला ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यासाठी मोबाईलला रेंज मिळावी यासाठी डोंगर डोंगर फिरत फिरत आहेत.तासनतास रेंज साठी पाणी पावसात डोंगराच्या माथ्यावर थांबावे लागते, रेंज मिळालीच तर पुर्ण फार्म भरला जाईल याची शाश्वती नसते.याबाबत महिलांना फार्म भरण्यासाठी मदत करणारा दिलीप वळवी म्हणाला कि, शहरात किंवा टावर असलेल्या गावी फार्म लवकर भरले जातात पण पाणी पावसात बसअभावी तीस चाळीस किलोमीटर पायपीट करीत , नदीच्या पाण्यातुन बाजारपेठला जाणे ही अशक्य आहे.