नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्राने प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतांनाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमीत्त व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देतांना पालकमंत्री यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या 105 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह अखंड महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्या हुतात्म्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावीत, खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, गोविंद दाणेज, कल्पना निळ-ठंबे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व विविध यंत्रणांचे प्रमुख-कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा लाभलेल्या आपल्या राज्याची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. महात्मा गांधीजींनी ‘महाराष्ट्र म्हणजे कर्तृत्ववान लोकांचे मोहोळ’ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही, असे सांगितले.
पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.
देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.
महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
यांचा झाला गौरव…
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते सुहास केशवराव गोसावी, यांना आदर्श तलाठी पुरस्काराचे प्रशस्तीपत्र व श्रीमती दिपमाला प्रकाश पाटील यांना पोलीस पाटील विशेष उल्लेखनिय सेवा पुरस्काराचे प्रशस्तीपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमीत्त व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, गोविंद दाणेज, कल्पना निळ-ठंबे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख-कर्मचारी आदी उपस्थित होते.