तळोदा l प्रतिनिधी
बोरद (ता.तळोदा) येथे (ता.१४) रोजी अक्षता कलश शोभा यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी हजारो संख्येने भाविक उपस्थित होते. ५०० पेक्षा जास्त महिलांनी डोक्यावर कलश घेत संपूर्ण गावात सुमारे ५ तास भ्रमण केले. दुपारी ४ वाजता अक्षता कलश शोभा यात्रेचे राम मंदिरात आरती होऊन समाप्ती करण्यात आली.
(ता.१४) रोजी सकाळी ११ वाजता राम मंदिर येथून अक्षता कलश शोभा यात्रेची भव्य दिव्य अशा मिरवणुकीला सुरुवात झाली.गेल्या १५ दिवसापासून अक्षता कलश यात्रेची जोरदार तयारी बोरद येथे सुरू होती. गावातील महादेव मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर, पुण्य पावन मंदिर, कोचरा माता मंदिर,देव मोगरा माता मंदिर, ग्रामदेवता मंदिर इत्यादी मंदिरांना रंगरंगोटी करून रोशनाई करण्यात आली होती. संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले होते, संपूर्ण गावात रांगोळी टाकण्यात आली होती, घराघरात भगवे झेंडे लावण्यात आले होते,
मिरवणूक ज्यावेळी निघाली त्यावेळी संपूर्ण गावात राम भक्तांनी रामाच्या भजनाने व जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून काढला होता.
यावेळी संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. प्रथमच १२ फुटी रामाची मूर्ती सजवलेल्या ट्रॉलीत ठेवण्यात आली होती. एका रथावर आयोध्या मंदिराची प्रतिकृती सजविण्यात आली तर एका रथात राम लक्ष्मण हनुमान असे जिवंत देखावे ज्यात जटायू, वाल्मीक रुषी यांचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला होता. सनातनी, नावडे हे घोड्यावर स्वार होते त्याचबरोबर ५० पेक्षा जास्त लहान मुलांनी वानराचे रूप परिधान केले होते.त्यामुळे वानर सेना बोरद येथे अवतारल्याचा भास होत होता. अक्षदा कलश यात्रा मिरवणूक शांततेने ५ तास गावात चालली. कलश यात्रेचे गावात पुष्पवृष्टी टाकून स्वागत करण्यात येत होते. या भव्य मिरवणुकीत अनेक भाविकांनी नवीन नवीन पोषाखा धार्मिक पद्धतीने परिधान करत डोक्यावर कलश घेऊन यात्रेत सहभाग नोंदविला होता.
रथामध्ये शबरी मातेची कुटी (झोपडी) आकर्षणाचे केंद्र ठरली होती. या अक्षता यात्रेत २००० पेक्षा जास्त भाविक सहभागी झाले होते.गावातील नागरिक आपसातील सर्व मतभेद विसरून या ठिकाणी एकत्र आले होते.
ढोल,ताशांच्या गजरात व गावातील महिला भजनी मंडळ,दत्त भजनी मंडळ, नवयुवक भजनी मंडळ यांच्या तालावर नाचत श्रीरामाचा जयघोष करत हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते.
ठरल्याप्रमाणे राम मंदिरापासून निघालेली शोभायात्रा दत्त मंदिर, सोनार गल्ली, करडे रस्ता, नवा घाट,इंदिरानगर, करणखेडा रस्त्याने मुख्य बाजारपेठेत तून राम मंदिरापर्यंत येऊन ४ वाजता आरती होऊन या मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
(ता.२२) जानेवारी दोन वेळेला आरती नियमित होणार असून पाच दिवस भजन कीर्तन होऊन शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. याच दिवशी रात्री दिवे लावण्यात येणार आहेत. ‘आमचे गाव आमची अयोध्या’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून परिसरातील हिंदू बांधव ही या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तळोदा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
समाजातील सर्व मतभेद विसररून स्वागतासाठी बोरद गावातील मुस्लिम बांधवांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढत व आलेल्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत सामाजिक ऐक्याचे या ठिकाणी दर्शन घडवले.
त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात बोरद येथे निघालेली ही सर्वात मोठी कलश शोभा यात्रा असल्यायाची प्रतिक्रिया उपस्थित नागरिक त्याचबरोबर बंदोबस्तासाठी हजर असलेल्या पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.








