नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील ज्या नागरीकांचे आधार नोंदणीस 10 वर्षांचा कालावधी पुर्ण झालेला आहे तसेच आधार कार्ड काढतांना आपले ओळखीचा पुरावा (पीओआय) व पत्त्याचा पुरावा (पीओए) संबंधी कागदपत्र ऑनलाईन सादर केले नाहीत अशा नागरीकांनी आपले आधार अद्ययावत करण्यासाठी ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा संबंधी कागदपत्रांसह जवळच्या आधार केंद्रावर प्रत्यक्ष जावुन आपले आधार अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
केंद्र शासनाच्यावतीने देशभर नागरीकांच्या आधार कार्ड नोंदणीची मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली असुन बहुतांश नागरीकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडील अधिसुचनेनुसार 16 ‘क’ कागदपत्रांच्या अद्यावयत नियमावलीनुसार आधार कार्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे.
प्रत्येक नागरीकास दर दहा वर्षांनी आधार अद्यावत करणे बंधनकारक करण्यात आले असून ज्या नागरिकांना आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. अशा नागरीकांनी आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार कार्डाशी ओळखीचा पुरावा (पीओआय) व पत्त्याचा पुरावा (पीओए) ऑनलाईन अद्यावत करून घेणे आवश्यक आहे. शासनाने आधार कार्डाशी संबंधी कागदपत्र ऑनलाईन अद्ययावत करणेसाठी रुपये 50 इतके शुल्क निर्धारित केले आहे.
यासाठी स्थानिक ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच, नगर सेवक, लोक प्रतिनिधी यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन आधार नोंदणीस 10 वर्षाचा कालावधी पुर्ण झालेल्या आधार कार्डधारकांना त्यांचे कागदपत्र ऑनलाईन अद्यावत करण्यासाठी सहकार्य करावे असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.








