नंदुरबार l प्रतिनिधी
गुरुवर्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने व गणेश आबासाहेब यांच्या मार्गदर्शनातून आज नंदुरबार येथे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत खानदेश विभागीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन सुमुल डेअरीचे माजी चेअरमन भरत पटेल व नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व तसेच शेतकरी जोडप्याकडून मातीचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, कृष्णराव दामजी गावित संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गावित, पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास नटावदकर ,मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर ,गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य महेद्र रघुवंशी ,माजी नगरसेविका अनिता चौधरी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी उपनगराध्यक्ष परवेज खान,निझर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन योगेश राजपूत, मोहित राजपूत, राजेश चौधरी ,आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते.

प्रारंभी नंदुरबार शहरातील मोठा मारुती येथून कृषी दिंडीला श्री स्वामी समर्थ महाराज व कृषी पालखीचे पूजन करून सुरुवात करण्यात आली व जी टी पी कॉलेज मैदान येथे कृषी दिंडीचा समारोप करण्यात आला या कृषी दिंडीत आदिवासी महिलांनी पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर केले तसेच लहान मुलांनी विविध वेशभूषा सादर करून सहभाग नोंदवला या कृषी दिंडीत शेकडो सेवेकरी सहभागी झाले होते .
यानंतर आयोजित मेळाव्यात प्रास्ताविकातून नंदुरबार जिल्हा केंद्राचे प्रमुख जीवन आबा देवरे यांनी कृषी महोत्सवा विषयी माहिती दिली व तीन दिवस चालणाऱ्या कृषी महोत्सवात आयोजित चर्चासत्र व त्यावर मार्गदर्शन यासंबंधी माहिती दिली .यावेळी प्रमुख पाहुणे व भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले की, अध्यात्माचे जोड हे आजच्या युगात किती महत्त्वाचे आहे हे आजच्या मेळाव्यातून समजते. आजच्या युगात शेती करणे हे अत्यंत जिकरीचे आहे परंतु शाश्वत व सेंद्रिय पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे.श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रच्या माध्यमातून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहेत .यावेळी बाल संस्कार व विवाह संस्कार चे प्रमुख आबासाहेब मोरे यांनी भ्रमणध्वनी वरून मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले की कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत . कृषी दिंडी , वधू – वर परिचय मेळावा , युवा उद्योग मेळावा विविध विषयांवर चर्चासत्राच्या माध्यमातून आपले निरसन करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी बियाण्यांमध्ये स्वावलंबन व्हावे म्हणून देशी बियाण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशी बियाण्यांवर काम करणाऱ्या विविध संस्थांनी महोत्सवासाठी स्टॉल दिले आहेत.
याशिवाय गरीब शेतकरी कुटुंबातील वधू – वरांचा परिचय मेळावा च्या माध्यमातून अनेक उपवर वधू यांच्या विवाहाच्या समस्या सुटणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतपिकांसाठी वापरले जाणारी घातक , रासायनिक खते , औषधे यांच्यामुळे गंभीर आजार होत असल्याने शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी यात गावरान बियाणे , घरगुती औषधे , खते , गाईचे शेण , गोमुत्र , झाडांचा पाला – पाचोळा याचा वापर करून सेंद्रिय शेती करून शुद्ध सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी , असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे कृषितज्ज्ञ आबासाहेब मोरे यांनी केले .
खानदेश विभागीय कृषी महोत्सवात दीडशेहून अधिक विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले असून यात सेंद्रिय कृषी विभागाचे, परसबाग ,रोपवाटिका यासह विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहे या सोबतच 12 बलुतेदार यांच्या सजीव देखावा ही मेळाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे.
दुसऱ्या सत्रात विषमुक्त शेती यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले .या चर्चासत्राला कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख पद्माकर कुंदे यांनी विषमुक्त शेतीवर मार्गदर्शन केले तसेच उपवर- वधु परिचय मेळाव्यात 200 च्या वर मुलांनी आपला परिचय करून दिला.








